सर्वात धक्कादायक बातमी! भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केंद्रात वर्षभरात दगावले ११० कोवळे जीव

110 babies died in NICU of bhandara district hospital in last year
110 babies died in NICU of bhandara district hospital in last year

नागपूर : वर्षभरात भंडारा जिल्ह्यात २३०० कमी वजनाचे बाळ जन्माला आले असून जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू काळजी केंद्रात अग्निकांडातील १० जीवांसहित ११० कोवळ्या जीवांचा बळी गेला. सुरक्षित मातृत्वासाठी राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानापासून, जननी शिशू सुरक्षा योजना, मातृत्व वंदन योजना अशा विविध योजनांचा जणू पाऊसच पाडला आहे. मात्र, सुरक्षित मातृत्वाकडे संवेदना जागृत ठेवून रुग्णालयाकडून काळजी घेतली जात नाही. यामुळेच असे मन हेलावणारे प्रसंग घडतात. २०१८-१९ साली राज्यात साडेबारा हजार प्रसूती घरीच झाल्या असून यातील १ हजार ३३८ बाळंतपणं नागपूर विभागाच्या भंडारासहित सहा जिल्ह्यातील आहेत. 

नवजात शिशू विशेष काळजी केंद्रात वार्मर, इनक्यूबेटरच्या तापमानाकडे लक्ष न दिल्यास आग लागण्याचे प्रकार घडतात. वेळीच खबरदारी घेतली तर आग लागल्यानंतर ती पसरण्यापूर्वी चिमुकल्यांचे जीव वाचविता येतात. मात्र, भंडारा येथील रुग्णालयातील आउट बॉर्न युनिटमध्ये कोणीच नसल्याने हे कोवळे जीव मृत्युमुखी पडले असल्याचे प्रथम दर्शनी पुढे येते. 

रुग्गवाहिका वेळेत न पोहोचल्याने सुकेशिनी झाली घरीच प्रसूती -
त्या गर्भवती मातेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. पोटातून काळजाचा तुकडा सुखरुप बाहेर यावा यासाठी वेदना सहन करीत होती. प्रसूतीच्या कळा उठल्यानंतर घरी नवऱ्याची धावाधाव सुरू झाली. तत्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला. अशा नाजूक स्थितीत सरकारची रुग्णवाहिका वेळेत पोहचलीच नाही, अखेर उसर्राच्या सुकेशिनी धर्मपाल आगरे ही माता घरीच बाळंत झाली. गोंडस बाळ आईच्या पदरात पडले. मात्र, वजन कमी असल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, गलथान कारभारामुळे रुग्णालयातील अग्निकांडात बाळ दगावलं. ही चित्रपटातील कहानी नाही, तर सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे भेसूर चित्र आहे. 

अतिदक्षता विभाग कंत्राटी परिचारिकांच्या भरवशावर -
भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी आप-आपले खासगी दवाखाने थाटले आहेत. यामुळे सहाजिकच खासगीकडे लक्ष आणि सरकारीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहेत. मात्र, यासोबतच आणखी एक वास्तव पुढे आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभाग कंत्राटी नोकरीवर कार्यरत असलेल्या परिचारिकांच्या भरवशावर होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. रुग्णालयात ज्या परिचारिका स्थायी, कायम स्वरुपात असतात, वरिष्ठ असतात, त्यांना दिवसा आणि ज्या कंत्राटी आहेत, नवीन आहेत, अशा परिचारिकांना रात्रकालीन सेवेत राबवून घेत असल्याची माहिती आहे. 

सुकेशनीच्या बाळासाठी ४० किमीचे अंतर कापून पोहोचवले दूध - 

सुकेशिनी घरीच बाळंत झाल्यानंतर काही वेळाने १०८ क्रमांकाची रग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचवण्यात आले. मातेला दुध नसल्याने बाळाला दूध पाजण्याची जबाबदारी रुग्णालयात परिचारिका सांभाळतात. मात्र, येथे कार्यरत परिचारिकांनी सुकेशिनीच्या नातेवाईकाला दुध आणून द्या असे निर्देश दिले. ४० किलोमीटर दूरू असलेल्या उसर्रा गावातून मध्यरात्री २ वाजतानंतर नातेवाईकांनी दुध पोहोचवून दिले, अशी तक्रार नातेवाईकांनी केली. याशिवाय अतिदक्षता विभागात वऱ्हांड्यात नातेवाईक रात्री थांबू नये यासाठी एक नवीन शक्कल परिचारिकांनी काढली, वऱ्हांड्यात रात्री पाणी टाकून ठेवण्यात येते. वऱ्हांडा ओला असल्याने नातेवाईक अखेर वरच्या किंवा तळमजल्यावर आराम करण्यासाठी नाईलाजास्तव जात होते. नातेवाईक वऱ्हांड्यात असते तर या घटनेत या बाळांचा जीव वाचवणे शक्य झाले असते. 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com