Video : RSS ने निवडणुकीच्या आखाड्यात उतरावे...यांनी दिले आव्हान

mohan bhagwat
mohan bhagwat

नागपूर : "आरएसएस'च भाजपला चालवित आहे. अशाप्रकारे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवने सोडा. लोकशाहीवर विश्‍वास असेल तर आपला अजेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात या, असे थेट आव्हान भीम आर्मीचे संस्थापक ऍड. चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी आज रेशीमबाग मैदानावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दिले. 

भीम आर्मीतर्फे "वूई द सिटीजन ऑफ इंडिया' यांच्या सहकार्याने शनिवारी रेशीमबाग मैदानावर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यातून रावण यांनी हुंकार भरला. तिरंगा ध्वज घेऊनच चंद्रशेखर यांचे व्यासपीठावर आगमन झाले. आज रेशीमबागेत तिरंगा ध्वज फडकवला आहे. तिरंगा फडकणार नाही, असा एकही भाग देशात उरू देणार नाही अशी गर्जना त्यांनी केली. देश कुणाच्या बापाचा नाही.



चंद्रशेखर आझाद यांचे रेशीमबागेतून सरसंघचालकांना आव्हान 
रोटी, कपडा, मकान, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, रोजगार देण्याची जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण, आज नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्मण झाली आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकांना दुय्यम दर्जाचे नागरिकत्व देण्याचा आरएसएसचा अजेंडा आहे. त्याचाच भाग म्हणून सीएए, एनआरसी, एनपीए आणले जात आहे. अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. सरकार मात्र सभा घेऊ देत नाही. आंदोलकांवर केसेस दाखल केली जात आहेत. आम्हीही डोक्‍याला "कफन' बांधून आलो असल्याचा इशारा देत मनुवादी विचार दूर लोटण्यासाठी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. 

मानवताच आपला धर्म 
देशात मनुस्मृती आणि संविधान या दोन विचारांमध्ये भांडण सुरू असून त्यात संविधानाचा विचारच भारी ठरेल. या देशात संविधानाचेच राज्य चालेल. भारतवासीयांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच इंग्रजांनाही पळावे लागले. आजही जनता आंदोलनसाठी रस्त्यावर आली आहे. यामुळे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचे राज्यही फारवेळ टिकणार नाही. देशातील सर्व महापुरुषांनी बंधुभावाची शिकवण दिली. त्यांचे चित्र नाही तर चरित्र पकडा. त्यांचाच वारसा पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. भारतात असलेली मानवताच आपला धर्म असल्याचे चंद्रशेखर आझाद म्हणाले. समीर अहमद सिद्धीकी, प्रफुल्ल शेंडे, मल्कीतसिंग बल, नेहा शिंदे, नागेश चौधरी उपस्थित होते. 

सरकार बदलेल, गुन्ह्यांचा हिशेब घेऊ 
सरकार हुकूमशाहा सारखे वागत आहे. आंदोलकांवर बंदुका, दंडे उगारल्या जात आहे. पण, लवकरच सरकार बदलेल, बहुजनांचे सरकार येईल. त्यावेळी प्रत्येक गुन्ह्यांचा हिशेब घेतला जाईल. कुणीही वाचणार नाही, असा इशारा देत रविवारी (ता.23) होणाऱ्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन चंद्रशेखर आझाद यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com