
बंददरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. शिवाय रस्त्यानेही ये-जा करणाऱ्यांची संख्या रोडावली होती. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने काही प्रमाणात सुरू होती.
अमरावती : केंद्र सरकारकडून पारित करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी राजधानी दिल्ली येथे ठिय्या दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी (ता. आठ) देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. तसेच काही ठिकाणी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली.
हेही वाचा - Bharat Band Updates : यवतमाळमधील कापूस खरेदी बंद, पणनसह सीसीआय़च्या केंद्रांवर शुकशुकाट
बंददरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. शिवाय रस्त्यानेही ये-जा करणाऱ्यांची संख्या रोडावली होती. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने काही प्रमाणात सुरू होती. दरम्यान, शहरातील राजकमल चौक येथे सर्वपक्षीय नेत्यांनी नारेबाजी करीत शेतकरीविरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावे, अशी मागणी केली, तर ग्रामीण भागातील धामणगावरेल्वे, चांदूररेल्वे, वरुड, मोर्शी, अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगावसुर्जी, दर्यापूर आदी तालुक्यांत रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली. या भारत बंदमध्ये किसान संघर्ष समितीसह काँग्रेस, आप, भाकप, माकप, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी सहभाग घेतला.
हेही वाचा - VIDEO : ऐन तारुण्यात दृष्टी गेली, पण 'ते' आताही घडवताहेत राज्यस्तरीय खेळाडू