तुमसर (जि. भंडारा) : तुमसर रोड ते तिरोडी या ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गाचे भाग्य उजळत असून या मार्गावर विद्युतीकरणाला वेग आला आहे. 2021 पर्यंत या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. मध्य भारताला जोडणारा हा महत्वपूर्ण रेल्वे मार्ग आहे.
सातपुडा पर्वतरांगात ब्रिटिशांनी मॅगनिज वाहतुकीसाठी तुमसर-तिरोडी दरम्यान 42 किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. 1928 मध्ये या मार्गाचे काम पूर्ण झाले होते. सध्या तिरोडी-कटंगी या 12 किमी रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. मध्य प्रदेशातील तिरोडी हे शेवटचे रेल्वेस्थानक आहे.
तुमसर-तिरोडी-कटंगी आणि बालाघाट असा हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार आहे. पुढे तो जबलपूरला जोडला जाणार आहे. मध्य प्रदेशात जाण्यास वेळेची बचत करणारा हा महत्वाचा मार्ग ठरणार आहे. यापूर्वी कोळसा व त्यानंतर डिझेल इंजिनवर रेल्वे धावत होती. पुढील काळात येथे विजेचे इंजिन धावणार आहे.
ब्रिटिशांनी चिखला, डोंगरी व मध्य प्रदेशातील तिरोडी खाणीचा शोध लावला. मॅग्निजची उचल करून वाहतुकीसाठी या मार्गावर रेल्वे ट्रॅक तयार केले. काही ठिकाणी दगड फोडून रेल्वे मार्ग तयार केला आहे. या मार्गावर आठ लहान मोठे रेल्वे स्थानक आहेत. त्यात तुमसर टाऊन, गोबरवाही, डोंगरी, तिरोडी हे प्रमुख मोठे स्थानक आहेत. परंतु, काही रेल्वे स्थानक वगळता इतर ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दिवसातून चार वेळा प्रवासी रेल्वेगाडी या मार्गावर धावते.
आर्थिकदृष्ट्या मजबूत
तिरोडी - कटंगी रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यानंतर आणि विद्युतीकरण झाल्यावर मध्य प्रदेशासोबत आर्थिक व व्यावसायिक संबंध निर्माण होण्यास मदत होईल. नागपूर, जबलपूर असा थेट रेल्वेमार्ग तयार होणार असून तुमसर तालुक्यातील प्रवाशांना याचा फायदा होईल.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.