राज्य सरकारची मदतीची घोषणा हवेत; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

Farmers Diwali in the dark no help by Goverment
Farmers Diwali in the dark no help by Goverment

यवतमाळ : दिवाळी अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्‍टरी दहा हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही प्रकारची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी अंधारात जाणार असल्याने शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे.

खरीप हंगाम शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारा ठरला. मागील चार वर्षांपासून शेतकरी सतत नापिकीचा सामना करीत आहेत. परतीच्या पावसाने सोयाबीन व कपाशीचे अतोनात नुकसान केले आहे. बोंडसड व बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकावर ट्रॅक्‍टर फिरविला. शेतकऱ्यांच्या घरात क्विटंलने येणारा कापूस यंदा केवळ दहाच-वीस किलो या प्रमाणातच आला आहे. सोयाबीनचेही मातेरे झाले.

शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्च निघाला नाही. "सीसीआय'ने कापूस खरेदी सुरू केली नाही. कापूस ओला असल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना हे कारण पटत नाही. घरात असलेला कापूस खराब होऊ नये, म्हणून शेतकरी कापूस कवडीमोल भावाने विक्री करीत आहेत.

खेडाखरेदीत शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. दिवाळीला कापूस, सोयाबीन विक्रीतून आलेल्या पैशांतून शेतकरी खरेदी करतात. यंदा चित्र उलटेच आहे. शेतातील उत्पन्न निघाले नाही.

राज्य सरकारने मदतीची घोषणा केली. प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. केंद्र व राज्य सरकारच्या भांडणात शेतकरी भरडला जात आहे. परिणामी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना मदत मिळाली, यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

काळी दिवाळी करण्याची वेळ
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. सीसीआयने अजूनही कापूस खरेदी सुरू केली नाही. खेडाखरेदीत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन काळी दिवाळी करण्याची वेळ आली आहे.
- साहेबराव पवार, शेतकरी

राज्य, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक
राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पडेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही मदत मिळाली नाही. राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे.
- सिकंदर शहा,
अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना, यवतमाळ

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com