
चंद्रपूर : वडिलांचा पाणीपुरीचा व्यवसाय होता. याच व्यवसायावर मुलांचे शिक्षण केले. दोन मुलींचे लग्न केले. कुटुंब आनंदी होते. मात्र, सासरच्या मंडळींनी दोन्ही मुलींना सोडून दिले. दोन्ही मुली वडिलांच्या घरी परत आल्या. वडील दुकान लावायचे त्या ठिकाणी नवीन हॉटेल उभारले गेले. व्यवसाय मोळकडीस आला. वृद्धापकाळाने वडिलांनाही व्यवसाय चालविणे शक्य नव्हते. अखेर या भगिनींनी पुढाकार घेत वडिलांचा व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. व्यवसायासाठी नवीन जागा शोधली. दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत पाणीपुरीचा व्यवसाय करून कुटुंबाचा आधार बनल्या आहेत. सविता आणि प्रतिभा अशी भगिनींची नावे आहेत.
शहरातील ख्रिश्चन कॉलनीत प्रकाश महाजन हे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा त्यांचा परिवार. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रकाश महाजन यांनी पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. रस्त्याच्या कडेला सायंकाळी दुकान लावायचे. रात्रीपर्यंत होणाऱ्या विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, असा त्यांचा दिनक्रम होता. या व्यवसायात मुलांना न आणता त्यांना शिक्षण दिले. सविता ही दहावी, तर प्रतिभा हिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर योग्य वर बघून दोन्ही मुलींचे हात पिवळे केले.
दोन्ही मुली संसारात आनंदी होत्या. दोघींच्याही संसारवेलीवर प्रत्येकी दोन फुले उमलली. मात्र, काही वर्षांनंतर सासरच्यांनी दोन्ही मुलींना सोडून दिले.
सासरच्यांनी सोडल्यानंतर दोन्ही मुली वडिलांच्या घरी परत आल्या. महाजन कुटुंबीयांवर हा मोठा धक्का होता. तरी वडील प्रकाश महाजन हे पाणीपुरीच्या व्यवसायातून कुटुंबाचा गाडा हाकत होते. पुढे जाऊन या व्यवसायात मुलगा कामात येईल, अशी स्वप्ने महाजन कुटुंबीय रंगवीत होते. मात्र, मुलाचा मृत्यू झाला आणि कुटुंबांचे स्वप्न भंगले.
आता वडिलांनाही वृद्धापकाळाने उभे राहून पाणीपुरीचा व्यवसाय करणे शक्य नव्हते. त्यामुळे सविता आणि प्रतिभा या दोन भगिनींनी वडिलांचा व्यवसाय चालविण्याचा निर्णय घेतला. कस्तुरबा मार्गाने वडील जेथे व्यवसाय करायचे तिथे ठेला लावून व्यवसाय करू लागल्या. मात्र, काही दिवसांनंतर या ठिकाणावर मोठे हॉटेल उभारल्या गेले. हॉटेल पुढे पाणीपुरीचा ठेला लावणे, ही बाब हॉटेल मालकाला आता पटली नाही. त्यामुळे त्यांनी पाणीपुरीचा ठेला लावण्याला विरोध केला.
पाणीपुरीचा व्यवसाय बंद झाल्याने घरचा उदरनिर्वाह चालविण्याचा मोठा प्रश्न भगिनींसमोर निर्माण झाला. मात्र, या भगिनींनी धीर सोडला नाही. शहराचा फेरफटका मारला. व्यवसायासाठी योग्य जागेचा शोध घेतला. त्यानंतर जयंत टॉकीजच्या बाजूला पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. आजघडीला या भगिनी दुपारी दोन वाजता आपला पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करतात.
रात्री दहा वाजेपर्यंत खवय्यांची मोठी गर्दी हातठेल्यावर असते. या व्यवसायातून आजघडीला आठ सदस्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्या पार पाडत आहेत. सासरच्यांनी सोडल्याचे दु:ख बाजूला सारत कुटुंबाचा आधार बनलेल्या या भगिनी ‘आत्मनिर्भर’ भारताच्या खऱ्या आयकॉन आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.