अंगणवाडीच्या अमृत आहारात अळ्या; अंडी आणि केळी दिल्याचे कागदोपत्री, पोषण आहारात गौडबंगाल

Tribal community planning only documents
Tribal community planning only documents

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटला कित्येक वर्षांपासून बालमृत्यूचा कलंक लागलेला आहे. मात्र, जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर दिसत नाही. बालमृत्यू, कुपोषण, उपजत, गरोदर माता मृत्यूचे प्रमाण वाढीस लागले असताना पोषण आहार मात्र योग्य दिला जात नाही. प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. आदिवासींसाठी असलेल्या शासनाच्या योजना कागदोपत्री सुरू असल्याचे दिसत आहे. याकडे विशेष करून आयसीडीयस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांयांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

आदिवासी समाजातील गर्भवती तथा स्तनदा महिलांसाठी अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येते. परंतु, चिखलदरा तालुक्‍यात या योजनेची अंमलबजावणी कागदोपत्री दिसत आहे. याबाबत विविध संघटनांनी अनेक वेळा आवाज उठविला. मात्र, अद्यापही त्याची दखल घेतली गेली नाही. परिणामी अमृत आहार योजनेला हरताळ फासला जात आहे.

मेळघाटातील आदिवासी समाजाचे बहुतांश नागरिक निरक्षर आहेत. त्याचाच फायदा काही अधिकारी व काही अंगणवाडी सेविका घेत आहेत. केवळ कागदावर पोषण आहार दाखवून लाखो रुपये हडपले जात असल्याचा आरोप मेळघाटातील नागरिकांकडून होत आहे.

चिखलदरा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. अनेक गावे शंभर टक्‍के आदिवासी आहेत. तालुक्‍यात राबविण्यात येत असलेल्या योजनेत गरोदर, स्तनदा मातांना सकस आहार अंगणवाडीमार्फत देण्यात येतो. मात्र, या आहारातून सकस आहार गायब झाला आहे.

काही अंगणवाड्यांमध्ये तर आहारच दिला जात नसल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे अंगणवाडीच्या अमृत आहारात अळ्या निघाल्याची बाब पुढे आली आहे. या अळ्या निघाल्याचा व्हिडिओ दै. ‘सकाळ’च्या हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये स्तनदा माता जेवणामध्ये अळ्या निघाल्याचे सांगत आहे. त्यामुळे मिळणारा पोषण आहार पोषक नसल्याचे स्पष्ट लक्षात येत आहे. तसेच सहा वर्षांपर्यंत बालकांना अंडी आणि केळी दिली जाते. मात्र, हा आहारसुद्धा कागदोपत्री पाहायला मिळत आहे.

योजनांकडे लक्ष देणे गरजेचे

मेळघाटच्या अंगणवाडी केंद्रात स्तनदा माता, गरोदर माता यांची नोंद असूनही या योजनेला हरताळ फासला जातो. आदिवासी समाजासाठी असणाऱ्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे हा समाज या योजनांपासून कोसोदूर आहे. परिणामी उपजत, कुपोषणसह बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आयसीडीयस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमृत आहार योजनेसह इतरही योजनांकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

चौकशी करून कारवाही करण्यात येईल
चिखलदरा तालुक्‍यात पोषण आहाराकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. अळ्या निघाल्याची तक्रार अद्यापही कार्यालयाला प्राप्त झालेली नाही. अशी काही तक्रार आल्यास चौकशी करून कारवाही करण्यात येईल.
- भीमराव वानखडे,
बालविकास अधिकारी, चिखलदरा

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com