कोरोनाच्या काळात महिलांची जबाबदारी कोण घेणार? 'यांनी' केला मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल..वाचा सविस्तर   

who will take responsibility of women during corona bjp leader asked CM
who will take responsibility of women during corona bjp leader asked CM

अमरावती: राज्यात महिलांवरील अत्याचारांत सातत्याने वाढ होत आहे.  त्यात बडनेरा येथील मोदी रुग्णालयात चार दिवसांपूर्वी एका युवतीच्या तपासणीवेळी एका कर्मचाऱ्याकडून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेवर राजकीय आणि सामाजिक स्तरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षांनी थेट मुख्यमंत्रांना संतप्त सवाल केला आहे. 

आता तर कोरोनामुळे विलगीकरणात राहण्याचीसुद्धा महिलांना भीती वाटावी इतपत परिस्थिती बिघडली आहे. विलगीकरण कक्षात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली असून आता तरी शासनाने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे. 

 विलगीकरण कक्षांसंदर्भात कुठलीही नियमावली नाही 

बडनेरा येथील मोदी रुग्णालयात चार दिवसांपूर्वी एका युवतीच्या तपासणीवेळी एका कर्मचाऱ्याकडून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेतील पीडित युवतीची चित्रा वाघ यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. चित्रा वाघ म्हणाल्या, की कोल्हापूर, पनवेल, चंद्रपूर आणि आता अमरावतीमध्ये महिलांच्या अस्मितेशी खेळ करण्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य शासनाकडून विलगीकरण कक्षांसंदर्भात कुठलीही नियमावली आजवर तयार करण्यात आली नाही. 

महिलांची जबाबदारी कोण घेणार

सदर घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा जबाबदार धरले गेले पाहिजे. महिलांचे सशक्तीकरण, सक्षमीकरण या केवळ वल्गना ठरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता महिलांच्या सुरक्षेसाठी समोर आली पाहिजे. लवकरात लवकर दिशा कायदा अस्तित्वात आणला पाहिजे. याशिवाय क्वारंटाइन सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम करण्याची गरज असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. आज कोरोनाचे संकट घोंघावत असून महिलांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती राधा कुरील, दीपक खताडे, लता देशमुख, गंगा खारकर, अर्चना डेहनकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

'ते' आरोप नैराश्‍यातून

बडनेरा घटनेबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर केलेले आरोप नैराश्‍येच्या भावनेतून केले आहेत. आम्ही डोळसपणे त्यांना व्यवस्थेतील अंधार दाखवित आहोत. कोरोना तपासणीबाबत शासनाने अधिक जागरूकता आणणे गरजेचे आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com