वुमनहूड : मी पाहिलेले स्वामीजी

Radhika-Deshpande
Radhika-Deshpande

हिमालयापासून महासागरापर्यंत आपल्याला दिसतो तो अखंड भारत, असे ‘चाणक्य’ मालिकेमध्ये आपणास सांगतात. हा अखंड भारत आता विभक्त झाला आहे. चाणक्यानंतर एवढी देदीप्यमान दृष्टी असलेला साधुपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वधर्म समभाव, वसुधैव कुटुंबकम, हिंदू संस्कृती दर्शन आणणारे, युवकांचे प्रतिनिधित्व करणारे स्वामी विवेकानंद होऊन गेले. जाताना त्यांचे स्वप्न भारतातील युवकांना सोपवून गेले. ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका,’ असा शक्तिशाली मंत्र देऊन गेले. कधी कधी मला प्रश्न पडतो, असा हलवून टाकणारा मंत्र, भारावून टाकणारे विचार, ध्यास लावणारे स्वामीजी आपल्यात नाहीत?

आज आपल्याला निधड्या छातीचा, सहस्र हत्तींचे बळ असलेला, हृदयी समस्त मानवतेच्या भल्याचा विचार करणारा, दूरदृष्टी बाळगणारा, स्वाभिमानी, निर्भय नेतृत्व करणारा, कर्तव्यनिष्ठ अभि-नेता हवा, जो राष्ट्रप्रेम, समाजकारण आणि संस्कृती जपणारा हवा. आज स्वामीजी तुमची गरज आहे. बहुतांश टक्के युवक हा डोळ्यांवर झापड लावलेला, हरवलेला, आत्ममग्न, स्वल्पविचारी असल्यामुळे त्याला जागे करण्यासाठी तुम्ही हवे आहात. मला राहून राहून असं वाटतं, की स्वामीजी आजही त्यांना अभिप्रेत असलेल्या युवकांच्या शोधात आहेत. अशा महान आत्म्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी गेली ५ वर्षं कन्याकुमारी येथील ‘रॉक मेमोरियल’च्या समुद्री बेटावर ध्यानवंदना करण्यासाठी वर्षातून एकदा एकटीच प्रवास करते.

गोळवलकर गुरुजी, एकनाथजी रानडे यांच्याबरोबरच हजारो लोकांच्या पुढाकारातून साकारलेले विवेकानंद रॉक मेमोरियल हे एक अनुभवण्यासारखे ठिकाण आहे. माझा हा प्रवास माझ्या नकळत माझ्या लहानपणीच सुरू झाला होता. आई मला लहानपणी नागपूरमधील रामकृष्ण मठात न्यायची. मग कॉलेजमध्ये असताना एकटीच जायला लागले. तिथली स्वच्छता, शीतलता आणि साधेपणा मला सुखावून जायचा. एका शांत क्षणी स्वामी विवेकानंदांचे चित्र मला आकर्षित करायचे. मी त्यांची पुस्तके वाचायला सुरुवात केली. 

मी बंगळूरूला असताना आईने फोन करून सांगितले, की तिने ‘राधिका क्रिएशन्स’ या संस्थेअंतर्गत हिंदी महानाट्य दिग्दर्शनासाठी घेतले आहे आणि नाटकाचे नाव आहे ‘स्वामी विवेकानंद’. आनंद तर झालाच पण त्याच क्षणी इच्छा जागृत झाली रॉक मेमोरियलवर जायची इच्छा. नाटकाचे १४८ प्रयोग झाले, मात्र रॉकवर जाण्याचा योग्य आलाच नाही. मग मी माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून एकटीच रॉकवर जाण्याची इच्छा नवऱ्याकडे व्यक्त केली. पुढील प्रवास सहज होत गेला. शिलामंडपात असलेल्या उंच अशा स्वामी विवेकानंदांच्या मूर्तीकडे मी डोळे भरून पाहते आणि माझे हात जोडले जातात. स्वामीजींनी ज्या बेटावर ३ दिवस ३ रात्र ध्यानधारणा, तपश्चर्या आणि समृद्ध भारताची कामना केली, त्या बेटावर मी किमान ३ तास ३ मिनिटे तरी ध्यान करावे असे मनोधैर्य बाळगते. या वेळी आपण ध्येयनिष्ठ, समाजनिष्ठ आहोत का असा प्रश्न मनाला शिवून जातो. चारही वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, भगवदगीतेमधील सामर्थ्य आपल्याला कळलं आहे का? आपल्यातली ज्ञानज्योत तळपत्या सूर्याप्रमाणे कधी प्रज्वलित करणार आहोत? असे अनेक प्रश्न माझ्या मनाचे आजही वेध घेत असतात.

या सगळ्या प्रश्नांचा आणि माझ्या कन्याकुमारी प्रवासाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असावा. संबंध आहे, माझ्या आध्यात्मिक प्रवासाशी. नाट्यकलेचे प्रशिक्षण बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम साधन आहे, ज्यामध्ये आध्यात्मिक, सामाजिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास होतो. शिक्षिका म्हणून माझी जबाबदारी वाढते. अंतर्मुख झाल्याने जाणिवेपासून नेणिवेपर्यंतचा प्रवास मी गाठते. मी माझ्या बालमित्रांना नेहमी सांगते, ‘‘कलाकार हा उपजतच नेता असतो. त्याला आत्मविश्वास, आवाज, शब्दसंच, शब्दप्रयोग, चातुर्य, ताठा, विनय, दांडगा हवा.’’ याकरिता मी विवेकानंदांचा अभ्यास करायला सांगते. स्वामी विवेकानंद नाटकाचे प्रयोग अजून सुरू आहेत. २०२०मध्ये याचे अमेरिकेत १० प्रयोग होणार होते, ज्यामध्ये मी भगिनी निवेदिताची भूमिका साकारते. यावर्षी ते प्रयोग होऊ शकले नाहीत पण पुढल्या वर्षी ते होतील अशी अशा करते. मी माझ्या स्वामीजींना परत पश्चिमेकडे घेऊन जाणार.

यावर्षीही मी रॉक मेमोरियलला जाणार आहे. स्वामी विवेकानंदांच्या सान्निध्यात तुम्ही दुःखी, अस्थिर, उदास आणि बेचैन अवस्थेत गेलात, तर तुम्ही शांत, स्तब्ध, निश्चल, स्थिर आणि धैर्यनिष्ठ व्हाल. समर्पणाची भावना तेवढी हवी, मग स्वामीजी तुमच्यातच आहेत असे समजा. आजही मी त्यांना पाहते आहे. मला नम्रता, नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, त्याग, संयम, सेवावृत्ती, परोपकार, समजूतदारपणा, सामाजिक भानाची जाणीव, जबरदस्त इच्छाशक्ती, स्मित आणि मेहनत दिसते. या सगळ्यांचे एकरूप झालेले रसायन आणि त्याही पलीकडे जाऊन माझ्या छोट्याशा बुद्धीला अवगत न झालेला ब्रह्मस्वरूपी ज्ञानाचा सागर म्हणजेच स्वामीजी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com