चंदीगड : एकीकडे केंद्राने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme) देशभरात विरोधाची लाट उसळली आहे. तरूणांसह विरोधी पक्षांकडून केंद्रावर हल्लाबोल केला जात आहे. त्यात आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनीदेखील उडी घेतली असून, केंद्राच्या अग्निपथ योजनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Bhagwant Mann On Agnipath Scheme)
मान म्हणाले की, आम्ही सैनिकांना भाड्याने (Army On Rent) ठेवू शकत नाही. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांना माजी सैनिक कसे बनवू शकतो? असा सवालदेखील मान यांनी उपस्थित केला आहे. सैनिक अतिशय कठोर परिस्थितीत देशाचे रक्षण करतात असेही ते म्हणाले. राजकारणी कधीच निवृत्त होत नाहीत, फक्त सैनिक, जनता निवृत्त होते असे म्हणत त्यांनी आम्हाला आणि देशाला भाड्याने सैन्याची गरज नसून केंद्राने ही योजना त्वरीत मागे घ्यावी असे म्हटले आहे.
अग्निपथ योजना म्हणजे नो रँक-नो पेन्शन, ओन्ली टेन्शन
देशात लष्करात भरतीबाबत अग्निपथ योजनेवरून मोठा गदारोळ सुरु असताना काँग्रेसने पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्राच्या या योजनेवर काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, पवन खेरा आणि युवा नेता कन्हैया कुमार यांनी जोरदार टीका केली असून, अग्निपथ योजना हा नोटाबंदीसारखा निर्णय असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी व्यक्त केले आहे. तर, प्रमोद तिवारी यांनी अग्निपथ योजना म्हणजे नो रँक, नो पेन्शन, ओन्ली टेन्शन असे म्हटले आहे. (Congress On Agnipath Scheme)
'अग्निपथ' दिशाहीन पाऊल; सोनिया गांधींचं तरुणांना शांततेचं आवाहन
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी तरुणांना हिंसा न करण्याचं आवाहन केलं असून अग्निपथ योजना हे सरकारचं दिशाहीन पाऊल असल्याचं म्हटलं आहे. सोनिया गांधी यांची भूमिका मांडणारं एक पत्रच रमेश यांनी प्रसिद्ध केलं आहे.
या पत्रात सोनिया गांधी म्हणतात, "माझ्या प्रिय तरुण सहकाऱ्यांनो, तुम्ही भारतीय सैन्यात सामिल होऊन देशसेवेचं महत्वपूर्ण काम करण्याची आशा बाळगता. सैन्यात लाखो पदं रिक्त असतानाही गेल्या तीन वर्षात भरती न झाल्याचं दुःख मी समजू शकते. हवाई दलात भरती परीक्षा देऊन निकाल आणि नियुक्तीची वाट पाहत असलेल्या तरुणांप्रती देखील मी सहानुभूती व्यक्त करते"
मला याचं दुःख आहे की, सरकारनं तुमच्या आवाजाकडं दुर्लक्ष करत नव्या लष्कर भरती योजनेची घोषणा केली. सरकारचं हे पाऊल पूर्णपणे दिशाहीन आहे. तुमच्यासह अनेक माजीसैनिकांनी आणि संरक्षण तज्ज्ञांनी देखील या योजनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.