अकोला : आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या शेवटच्या तारखेपर्यंत केवळ एक हजार ७५६ विद्यार्थ्यांनीच निश्चित प्रवेश घेतला. परिणामी आरटीई कोट्यातील ५६७ जागा रिक्त आहेत. परंतु कोरोनामुळे काही शाळा बंद असल्याने प्रवेशासाठी गेलेल्या पालकांना प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे अशा पालकांनी पडताळणी समितीकडे अर्ज करावे. प्राप्त अर्जाची पडताळणी समितीने तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. सदर आदेशामुळे वंचितांना प्रवेशासाठी पुन्हा एक संधीच मिळणार असल्याचे काही शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. यावर्षी आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील २०१ शाळांमध्ये दोन हजार ३२३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील फेब्रुवारी, मार्च महिन्यात पार पडली होती. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ मार्च) जिल्ह्यातील ७ हजार ३३३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केले होते; परंतु आरटीईअंतर्गत केवळ दोन हजार ३२३ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. परिणामी मोफत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पाच हजार १० विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार नाहीत. दरम्यान यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरटीईची प्रवेश प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू होती. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु त्यानंतर सुद्धा अद्याप केवळ १ हजार ७५६ निश्चित, तर एक हजार २१० विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश झाले. त्यामुळे आरटीई कोट्यातील ५६७ जागा रिक्त आहेत.
(संपादन - विवेक मेतकर) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.