जामखेड (अहमदनगर) : मागील वर्षी गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत केली जाते. कर्जतच्या शेतकऱ्यांना पूर्वी दोन टप्प्यांत पैसे मिळाले आहेत. या वेळी दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
पावसामुळे मागील वर्षी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात प्रामुख्याने कर्जत तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा मोठा फटका बसला. आमदार पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. महसूल विभागाला तत्काळ पंचनाम्यांचा आदेश दिला. याबाबत पाठपुरावा केला. कर्जत तालुक्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील 10 गावांतील 287 शेतकऱ्यांना 18 लाख 11 हजार रुपयांचे अनुदान, तर जामखेड तालुक्यातील 19 गावांतील 391 शेतकऱ्यांना 27 लाख दोन हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक मदतीचा तपशील कृषी आयुक्तांमार्फत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. संयुक्त पंचनामे झाल्यानंतर 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली.
कर्जत तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात 12 कोटी 59 लाख रुपये आले होते, दुसऱ्या टप्प्यात 5 कोटी 10 लाख रुपये आले. आता तिसऱ्या टप्प्यातील रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.