Karjat
Karjat  sakal
अहमदनगर

अहमदनगर : कर्जत-जामखेडचा चेहरा बदलतोय

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : कर्जत-जामखेड आता बदलतेय. शेतीत नवीन प्रयोग होत आहेत. मुलांचे शिक्षण, मुली-महिलांची सुरक्षा याबाबत मतदारसंघ सजग झाला आहे. रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक वसाहत येतेय. खूप बदल केलेत. लवकरच हा मतदारसंघ संपूर्ण विकासात्मक दृष्टीने बदललेला दिसेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.सकाळ कार्यालयास शुक्रवारी (ता.२१) आमदार पवार यांनी भेट देत संपादकीय टीमशी संवाद साधला. आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी पवार यांनी मनमोकळेपणे चर्चा करीत विकासात्मक दृष्टीकोन सांगितला.

नुकतेच कर्जत नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीने बहुमत मिळवत सत्तांतर घडवून आणले. मागील वेळी पक्षाला एकही जागा नसताना १७ पैकी तब्बल १२ राष्ट्रवादीला व तीन कॉंग्रेसला असे १५ चे बहुमत करण्याची किमया पवार यांनी साधली आहे. याचे सर्व श्रेय त्यांनी कर्जतच्या जनतेला दिले. ते म्हणाले, की हा विजय मतदारांचा आहे. प्रचारासाठी लोकांमध्ये गेल्यानंतर तेथे लोकांचा प्रतिसाद चांगला होता. आपण करीत असलेल्या कामांबाबत लोक खूष होते. उमेदवारांनी लोकांमध्ये केलेल्या चांगल्या कामांची पावती मिळाली. हे मोठे परिवर्तन आहे. लोकांचा विश्वास नवनियुक्त उमेदवार सार्थ लावणार आहेत, यात शंका नाही.

मतदारसंघात लवकरच मोठा बदल

कर्जत-जामखेडमध्ये मायक्रो एरिगेशन वाढविले. तुरीच्या नवीन जातीचे बियाणे वापरले. पूर्वीच्याच खत, पाण्यावर दुप्पट उत्पन्न निघेल. असेच कांद्याचेही. फुरसुंगीऐवजी नवीन कांद्याची जात आणली आहे. मतदारसंघात पाच ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू केली. वखार महामंडळाकडून शेतीमालासाठी तीन टनांचे गोडावून बांधली. पाण्याचे नियोजन करताना १११ ठिकाणी संवाद कार्यक्रम घेतले. ड्रॅगन फ्रूटस, नवीन लिंबू, सुधारीत डाळींब, फिश कल्चर आदींवर विशेष प्रयोग सुरू आहेत. जगात असलेले नवनवीन संशोधन येथे राबवित आहोत. कृषी सेवाकेंद्रचालकांचे प्रशिक्षण घेतले. डिंभे बोगदा मंजूर केला. १४० किलोमीटर चाऱ्यांतील गवत काढले. झुडपे काढली. श्रीगोंद्यापासून डीपकट (दगड-माती) काढले. शेतकऱ्यांना योग्य दाबाने पाणी मिळेल, यासाठी ४०० गेट लावले. टेलच्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे, ही भूमिका आहे. आमच्या मतदारसंघाला कोणाच्या वाट्याचे नव्हे, तर स्वतःच पाणी तयार करून ते वापरणार आहोत. हे लवकरच दिसून येईल. मतदारसंघातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न होत आहेत. येत्या काही महिन्यातच औद्योगिक वसाहत होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला नॅशनल हाय-वे, पाणी, वीज हे प्राथमिक प्रश्न सोडवित आहोत. लवकरच स्मार्ट योजनेतून २० ते २२ मोठे प्रकल्प होतील. त्यामुळे भरपूर रोजगार उपलब्ध होणार आहे.

महिलांसाठी विशेष उपक्रम

तालुक्यात पूर्वी संध्याकाळी सातनंतर महिला, मुली घराबाहेर पडत नसत. आता मात्र आम्ही अभय दिले आहे. पोलिसांचा भरोसा सेल केला आहे. विद्यार्थीनी शाळेतून बसस्थानकावर जाताना किंवा बसस्थानकातून येत असताना या पथकाची गस्त सुरू असते. प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहेत. कोडिंग लॅब करीत आहोत. गावोगावी सुरक्षा समिती तयार करण्यात आल्या आहेत. या यंत्रणेचे विशेष लक्ष असते.

विभाजनाचं नव्हे, विकासाचं बोला

जिल्ह्याच्या विभाजनाबाबत बोलताना ते म्हणाले, की विभाजनाची मागणी करण्यापेक्षा जिल्ह्यातील पाणी, शैक्षणिक व्यवस्था, पर्यटन अशा कमकुवत विषयांकडे लक्ष द्यायला हवे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहराच्या विकासासाठी लक्ष द्यायला हवं. कोणावर अन्याय होणार नाही, असा विकास हवा. असे झाले, तर जिल्हा विभाजनाची मागणी होणार नाही.

कर्जत-जामखेडचे लोक खूप प्रेमळ

एका प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की बारामती, कर्जत-जामखेडमधील लोक प्रेमळ आहेत. दोन्ही ठिकाणचे लोक आमच्या कुटुंबावर प्रेम करतात. आई सुनंदाताई, वडील राजेंद्रदादा यांचे स्वतंत्रपणे कामे सुरू आहे. अगदी मराठवाड्यातही अनेक कामे सुरू आहेत. लोकांसाठी ते खूप वेळ देतात. महिलांचे प्रश्न सोडवितात. लोकांनी मतदान करून माझ्यावर प्रेमाने वर्षाव केला. विरोधकांनीही मते दिली, म्हणूनच मी निवडून आलो. आता लोकांना चांगल्या सुविधा देणे, हे माझे आद्य कर्तव्य आहे. दैनंदिन कामे खूप असतात. माझा दिवस सकाळी सहाला सुरू होतो आणि संपतो रात्री अकरा वाजता. असे असले, तरीही कुटुंबालाही पुरेसा वेळ देतो. वेळ मिळेल, तसे आवश्य वाचन असते. मला वाचनाची आवड आहे; परंतु खूप इतिहासात रमत नाही, तर सध्या काय चालले ते वाचतो. रोजच्या वृत्तपत्रांचे अग्रलेख वाचतो. इंटरनेटवरील नवीन लेख वाचायला आवडतात. आज काय घडतं, उद्या काय घडेल व त्यावर काय करायला हवं, याबाबत मतप्रदर्शन करतो. एकदा विधानसभेत कविता करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कमी वेळेत जास्त सांगण्यास मला आवडते. तेच मांडण्याचा प्रयत्न करतो. माझे काही व्यवसाय आहेत. ते सांभाळताना नियोजन असते. चांगले सीए आहेत. चांगले लोक काम करतात. त्यामुळे मी बाहेर वेळ जास्त दिला, तरीही व्यवसायावर त्याचा परिणाम होत नाही.

विरोधकांना चिमटा

विरोधकांवर बोलताना पवार म्हणाले, की कोरोनाच्या काळात काही लोक दीड वर्षे गायब होते. त्या वेळी लोकांना मदतीची गरज होती. प्रत्येक व्यक्ती अडचणीत होता. अशा वेळी राजकीय लोकांनी गायब होणे योग्य नसते. हेच विरोधकांनी केले. त्यामुळे लोकांनी त्यांना नाकारले. हे निवडणुकांतून दिसत आहे, असा टोला त्यांनी माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता लगावला. सोशल मीडियावर मी कायम सक्रीय असतो, हे खरं आहे. फेसबूक, ट्विटर जास्त वापरतो. रोज काही ना काही काम करतो. तेच टाकतो. त्यासाठी काहीतरी काम करावे लागते, हे विरोधकांना माहिती नसावं. चांगले काम करायचे. ते लोकांना समजायलाही हवं. त्याचं अनुकरण कार्यकर्तेही करतात. हे चांगलंच आहे. त्यात गैर काय; परंतु विरोधक कामच करीत नसतील, तर लोकांना काय सांगतील, असा चिमटा त्यांनी भाजपला काढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT