जळगाव( जामोद) : दोन महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीन सर्वच पिके मातीमोल झाली आहेत. स्वतः कृषी विभागाचे अधिकारी पीक पाहणी अहवाल तयार करण्यासाठी शेतावर जात असता एक गुंठाक्षेत्रात केवळ ३०० ते ५०० ग्रॅम सोयाबीन तयार होत असल्याचे विदारक चित्र आहे. असे असताना या दोन महिन्यात अतिवृष्टीने जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसानच झाले नाही? केवळ चार शेतकरी नुकसानाच्या मदतीस पात्र आहेत, असा विसंगत अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण असून, यामुळे संपूर्ण तालुका हा मदतीपासून वंचित राहणार आहे. म्हणून ता. २९ ऑक्टोबर रोजी भाजप पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन तालुका कृषी अधिकारी धीरज वाकडे यांना याविषयी जाब विचारला. जिल्ह्यात ६४००० शेतकरी फक्त नुकसान भरपाईसाठी पात्र असून यातील एकट्या सिंदखेड राजा तालुक्यात ५९,३९९ शेतकरी पात्र आहेत आणि उर्वरित जिल्ह्यात केवळ चार हजार शेतकरी पात्र आहेत. संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यात शून्य शेतकरी पात्र असून जळगाव जामोद तालुक्यात केवळ चारच शेतकरी पात्र कसे? असा सवाल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. कृषी विभागाने सादर केलेला हा अहवाल शेतकऱ्यांचे जीवावर उठला असून, शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहेत. तालुका कृषी विभागाने कोणत्या निकषानुसार हा अहवाल तयार केला की ज्यामुळे शासकीय मदतीपासून सर्व शेतकरी वंचित राहतील व पीक विम्यापासून सुद्धा शेतकरी वंचित राहणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावात येऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी असा अहवाल का पाठवला? या विषयी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली असून येत्या सात दिवसात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावरून वास्तवादी अहवाल पाठवावा अन्यथा भाजपाला रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. यावेळी भाजपचे जि. प. सदस्य बंडू पाटील, राजेंद्र उमाळे,अशोक काळपांडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश पाटील वाघ, शहराध्यक्ष अभिमन्यू भगत ,उपसभापती महादेव धुरडे नगरसेवक निलेश शर्मा ,डॉ प्रकाश बगाडे,एकनाथ वणारे,रामा इंगळे ,अजय वंडाले, राजू हिस्स्ल यांचेसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. (संपादन - विवेक मेतकर) | |||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.