अकोला : खरीप हंगाम सुरू होण्यास जेमतेम दिवस शिल्लक असल्याने कृषी विभागामार्फत बियाणे व खतांच्या पुरवठ्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यासोबत शेतकऱ्यांना योग्य दरात व चांगल्या दर्जाची बियाणे व खतं मिळावे, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील प्रत्येत तालुक्यात एक-एक या प्रमाणे सात तालुक्यात सात तर जिल्हा स्तरावर एक स्वतंत्र पथक तयार केले आहे. सदर पथक बियाणे, खतांची काळाबाजारी करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करेल.
जिल्ह्यात खरीप हंगाम मोजक्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागतीवर लक्ष देत आहेत. जुन महिन्यात पावसाला सुरूवात होताच शेतकऱ्यांची धाव बियाणे खरेदी करण्याकडे असेल. या महिन्यात शेतकरी बियाणे खरेदी करतात.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारण्याची शक्यता अधिक असते. परिणामी शेतकऱ्यांची फसवणूक होते व पेरण्या उलटतात. ही बाब लक्षात घेवून यावर्षी कृषी विभागाने बोगस बियाणे, खत विक्रीवर आळा ठेवण्यासाठी भरारी पथक तयार केले आहेत. सदर पथक बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करेल. त्यासोबतच कृषी केंद्रामध्ये जावून बियाण्यांची तपासणी सुद्धा करेल.
असे आहे जिल्हास्तरीय पथक
जिल्हास्तरीय पथकामध्ये चार अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात पथक प्रमुख म्हणून जिल्हा कृषी विकास अधिकारी डाॅ. मुरली इंगळे, सदस्य सचिव म्हणून माेहीम अधिकारी मिलींद जंजाळ आणि सदस्य म्हणून जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक नितीन लाेखंडे व वजप मापे निरीक्षक एस.वाय. अभंगे यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येक तालुक्यात एक पथक
जिल्हास्तरीय पथकाव्यतिरिक्त जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर व अकोट तालुक्यामध्ये प्रत्येक एक-एक पथक गठित करण्यात आले आहे. सदर पथकाचे प्रमुख तालुका स्तरीय कृषी अधिकारी राहतील.
संपादन - विवेक मेतकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.