Disaster Management esakal
Blog | ब्लॉग

आपत्ती व्यवस्थापन हवे सज्ज अन् सावध

डॉ. राहुल रनाळकर

कोकण, कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा पडला. असंख्य सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले, प्रचंड वित्तहानी झाली. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीनुसार नाशिकने आता सावध होण्याची वेळ आली आहे. नाशिक परिसरातील धरणे भरल्यानंतर ऑगस्टअखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये गोदावरीला पूर येतो. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील पावसाचा तडाखा पाहता आणि पावसाच्या अंदाजाप्रमाणे नाशिक परिसरात जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यानंतर येणाऱ्या संभाव्य पुराचा धोका ओळखून आपत्कालीन यंत्रणांनी सज्ज आणि सावध राहायला हवे. दर वर्षी ही यंत्रणा जशी सज्ज असते, त्यापेक्षा अधिक सज्जता या वेळी बाळगावी लागेल.

गोदावरीला २००८ मध्ये आलेला महापूर हा ४० वर्षांनंतरचा सर्वांत भीषण महापूर होता. या महापुराने प्रचंड हानी झाली. सरकारवाड्यापर्यंत तेव्हा पाणी शिरले होते, सराफ बाजार पूर्ण पाण्याखाली होता. २००८ नंतर २०१६ आणि २०१९ मध्येही नाशिकने महापुराचा सामना केला. या पुरांच्या वेळीदेखील आपत्कालीन यंत्रणा होती, पण ती अपुरी पडत होती. गोदावरीला पूर आल्यानंतर निफाड तालुक्याला सर्वाधिक फटका बसतो. तेथे पुरात निर्माण होणाऱ्या समस्या २५ वर्षांपासून जैसे थे आहेत. निफाडमधील साधारण ३० किलोमीटर परिसरातील गावांचा यात अग्रक्रमाने विचार व्हायला हवा. दारणा-गोदावरीचा संगम दारणा सांगवीला होतो, तिथून पुढे महापुराचा सर्वाधिक फटका बसतो. या गावांत वऱ्हेदारणा, चाटोरी, चांदोरी, सायखेडा, गोंडेगाव, शिंगवे, करंजगाव, कोठुरे, चापडगाव, मांजरगाव, काथरगाव, कुरडगाव ही गावे प्रामुख्याने येतात. या गावांमध्ये काय उपाययोजना करता येतील, याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने आत्तापासून करायला हवे.

पाणवेलीचा प्रश्‍न हा अत्यंत गंभीर आहे. सध्यादेखील पाणवेलींमुळे पूरस्थिती निर्माण होत आहे. कोठुरे-करंजगाव आणि सायखेडा-चांदोरी या दोन्ही पुलांची उंची कमी आहे. या पुलात पाणवेली मोठ्या प्रमाणात अडकतात, त्यामुळे पुराचा विस्तीर्ण फुगवटा तयार होतो, शेकडो एकर शेतजमीन त्यामुळे पाण्याखाली जाते, गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरते. पाटबंधारे विभाग ही पाणवेली काढण्याचे काम दर वर्षी करत असूनही या स्थितीत गेल्या २५ वर्षांत सुधार झालेला नाही. पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण झाल्यावर एक-दोन दिवस पाणी वाहते केले जाते. पण, पाणवेलींमुळे पुन्हा तीच स्थिती होते. यावर ठोस उपाययोजना व्हायला हवी. गेटमधून पाणी सोडण्याचे अचूक नियोजन पाटबंधारेकडून अपेक्षित आहे. अनेकदा हे नियोजन चुकते. हे काम संवेदनशीलतेने करायला हवे. ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून किंवा चांदोरीसारख्या लहान गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या धर्तीवर प्रत्येक गावात युवकांना आरोग्यासह आपत्तीचे प्रशिक्षण देत गट तयार व्हायला हवेत. त्यामुळे प्रशासनावरील भार हलका होऊ शकेल. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत महाविद्यालयातील नौकायन करणाऱ्या प्रशिक्षित तरुणांची टीमदेखील आपत्कालीन स्थितीसाठी नेहमी सज्ज असते, हीदेखील एक कौतुकास्पद बाब आहे.

आतापासून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा पूर्ण अभ्यास होऊन सराव सुरू व्हायला हवा. शेतमजुरांना योग्य वेळी स्थलांतरित करायला हवे. पाण्यासाठी नदीत सोडलेल्या विजेवर चालणाऱ्या मोटारी बंद करण्याच्या सूचना त्वरेने देण्याची यंत्रणा विकसित व्हावी. गोदा, दारणेत येऊन मिळणारे केमिकलयुक्त पाणी तातडीने बंद व्हावे, कारण हे पाणी नाशिक, नगर, औरंगाबाद या तीन जिल्ह्यांसाठी तसेच कोपरगाव, राहता, येवला, वैजापूर, शिर्डी या पाच नगर परिषदांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी यात लक्ष घालावे. एकूणच जिल्ह्याची आपत्कालीन यंत्रणा केवळ नावापुरती राहू नये, त्यांनी पूर्ण क्षमतेने सज्ज व्हावे, सावध असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT