नवी दिल्ली - हिंदी पट्ट्यात किमान एक तरी दणदणीत विजयासाठी आसुसलेल्या कॉंग्रेसची बिहारच्या निकालांनी पुन्हा एकदा निराशा केली आहे. आघाडी करताना वाढीव जागा पदरात पाडून, मतांची टक्केवारी वाढवूनही बिहारमध्ये कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या सातने घटल्याने सत्तासोपान गाठण्यात ‘महागठबंधन’पुढील अडथळा वाढला. परिणामी राहुल गांधींच्या नेतृत्व करिष्म्यावर आणि राष्ट्रीय राजकारणात कॉंग्रेसच्या ताकदीवर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता वाढली आहे.
झपाट्याने बदलणाऱ्या निकालांमुळे बिहारमधील सत्तास्थापनेची चुरस वाढली आहे. मात्र, संपूर्ण निवडणूक काळात सत्ताधारी जेडीयू-भाजप सरकारविरोधात जाणविणारा जनाक्रोश मतपेटीमध्ये रुपांतरीत न झाल्याची चिंता कॉंग्रेसला सतावू लागली. त्यामुळे जेडीयू-भाजपची परंपरागत ताकद असलेले मतदारसंघच वाट्याला आल्याने फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही, असे दावे कॉंग्रेसकडून सुरू झाले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बिहारमध्ये सत्ताविरोधी वातावरणाचा फायदा घेण्यासाठी कॉंग्रेसने बऱ्यापैकी ताकद लावली. घासाघीस करून ७० जागा पदरात पाडून घेतल्या. परंतु या पक्षाचे फक्त २० उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत महाआघाडीमध्ये ४३ जागा मिळूनही २३ आमदार कॉंग्रेसला विधानसभेत पाठवता आले होते आणि मतांची टक्केवारी ६.७ टक्के होती. यंदा कॉंग्रेसचा विस्तार वाढला असून मते देखील ९ टक्क्यांपेक्षा अधिक मिळाली असली तरी मागच्या पेक्षा सात जागा गमावल्या आहेत. या ७० पैकी ६७ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीत जेडीयू-भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे भाजपशी थेट लढत असलेले मतदारसंघ कॉंग्रेसला मिळाल्याने यशावर परिणाम झाल्याचे कॉंग्रेसमधून सांगितले जात आहे.
बंगाल, आसामसाठी रणनिती बदलावी लागणार
कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन, लॉकडाउनदरम्यान पलायन करणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी मोफत रेल्वे प्रवासाची मागणी यासारख्या कॉंग्रेसच्या मुद्दयांचा बिहारमध्ये काहीही फरक पडलेला नाही. असे असले तरी बिहारमध्ये कॉंग्रेसचा विस्तार वाढल्याने कॉंग्रेस नेते समाधान मानत असून येत्या काळात पश्चिम बंगाल, आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती बदलावी लागेल, असेही पक्षाचे नेते म्हणत आहेत.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘एक्झिट पोल’चा उत्साह टिकला नाही
बिहारमध्ये राजदच्या भरवशावर चमत्काराची अपेक्षा करणाऱ्या कॉंग्रेसच्या २४ अकबर मार्ग या मुख्यालयामध्ये एक्जिट पोलमुळे उत्साह संचारला होता. मात्र आज निकालांचे कल समोर आल्यानंतर मुख्यालयातील निराशेचे वातावरण होते. वृत्तवाहिन्यांवर किल्ला लढविणाऱ्या प्रवक्त्यांव्यतिरिक्त बड्या नेत्यांनी मुख्यालयात फिरकणेही टाळले.
मतदारांनी साथ दिली नाही
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा, चीन-पाकिस्तानच्या निमित्ताने राष्ट्रवादाचा मुद्दा प्रचारात आणण्याचा प्रयत्न हाणून पाडल्याचे आणि रोजगार, बिहारची अधोगती या सकारात्मक मुद्द्यांवर भाजप, नितीशकुमारांना बोलण्यास भाग पाडल्याचे कॉंग्रेस नेते सांगत राहिले तरी या पक्षाला मतदारांनी साथ देण्याचे सरळसरळ नाकारले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.