नवी दिल्ली : महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापन करण्याच्या हलाचालींना अंतिम स्वरूप येताना दिसत आहे. या संदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत एकमत झाले असून, उद्या (शुक्रवार, 22 नोव्हेंबर) मुंबईत अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
दिल्लीत आज, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची
दुसरी बैठक झाली. त्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावर एकमत झाले. या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, 'राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. दोन्ही पक्षांची सर्व मुद्द्यांवर चर्चा संपली आहे. आता आम्ही नेते उद्या मुंबईत जाऊन आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करणार आहोत. चर्चा झाल्यानंतर त्यानंतर शिवसेनेशी चर्चा होणार आहे. त्यानंतरच सर्व चर्चांची माहिती तुम्हाला दिली जाईल. सध्या मीडियात काही बातम्या येत आहेत. त्यासगळ्या शक्यता आहेत. शिवसेनेशी अंतिम चर्चा करून, त्यावर निर्णय घेतला जाईल.'
दोन दिवसांत दोन निर्णायक बैठका
सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्यावरून चर्चा सुरू असल्याची माहिती होती. पण, त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतेही भाष्य केले नाही. या सर्व शक्यता असल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची शिवसेनेसोबत चर्चा झाल्यानंतर तुम्हाला सर्व काही सांगितले जाईल, असे स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. या बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर पवार यांच्याशी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या झालेल्या बैठकाही निर्णायक ठरल्याचे दिसत आहे. आता आजच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्याचे दिसत आहे.
आणखी बातम्या वाचा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.