भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली असता, थोडे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात भारतातील कोरोना रुग्णांचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढले होते. यादरम्यान भारत जगातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला होता. सध्याही भारत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तिसऱ्या स्थानी असून अमेरिका आणि ब्राझील अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. मागील काही दिवसांपासून भारतातील कोरोनाची रुग्णवाढ प्रतिदिन 60-65 हजारांच्या घरात होती.
आता कोरोनाबद्दल सकारात्मक बातमी येत आहे. '13 ऑगस्टनंतर भारतात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढ आणि मृत्यू कमी होऊ लागल्याचे दिसत आहे. मागील 24 तासांत सर्वाधिक 57 हजार 937 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंतचा एका दिवसातील हा कोरोनामुक्तीचा उच्चांक ठरला आहे. मात्र हा पाच दिवसांचा काळ पाहता कोरोना रुग्णांबद्दल काही सकारात्मक बातम्या येत असल्या तरी लोकांनी बेसावध राहणे टाळावे', असे मत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मांडलं आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 55 हजार 79 नवीन रुग्णांची भर पडून 876 मृत्यू झाला आहे. कालच्या वाढलेल्या रुग्णांमूळे देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 27 लाख 2 हजार 742 वर गेला आहे. तर, आतापर्यंत देशात 51 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर जुलैच्या पहिल्या आठवड्यात 2.79 टक्के होता, आता तो 1.94 पर्यंत कमी झाला आहे. हा मृत्यूदर 1 टक्क्यांपेक्षाही कमी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. देशभरात आतापर्यंत 19 लाख 77 हजार 779 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 6 लाख 73 हजार 166 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच कोरोनामुक्त रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा 2.93 पटीने जास्त आहेत, अशी माहिती भूषण यांनी दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.