नवी दिल्ली : हरिद्वार आणि राजधानी दिल्लीतील धर्म संमेलनांमध्ये काही कथित आध्यात्मिक महंत आणि बाबांकडून करण्यात आलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांचा मुद्दा आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचला. याप्रकरणाची चौकशी करण्याबरोबरच अशाप्रकारची विधाने करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने आज केंद्र सरकार, दिल्ली पोलिस आणि उत्तराखंड पोलिसांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली तसेच याप्रकरणी नोटीस देखील बजावली आहे. भविष्यामध्ये अशाप्रकारची धार्मिक संमेलने होऊ नयेत म्हणून संबंधित याचिकाकर्त्यांना स्थानिक यंत्रणेकडे दाद मागण्याचीही परवानगीही देण्यात आली आहे. न्या. सूर्या कांत आणि न्या. हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने याप्रकरणाची सुनावणी आणखी दहा दिवसांनंतर होईल, असे स्पष्ट केले.
पत्रकार कुरबान अली आणि पाटणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि ज्येष्ठ विधिज्ञ अंजना प्रकाश यांनी याबाबतची याचिका सादर केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी या धर्मसंसदेमध्ये करण्यात आलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांची विशेष तपास पथकाच्या माध्यमातून स्वतंत्र आणि निपक्ष सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली होती. न्यायालयाने याची दखल घेत काहीजणांना नोटीस बजावून या प्रकरणाची सुनावणी दहा दिवस पुढे ढकलण्याचे निर्देश दिले. आज याचिकाकर्त्यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आता दहा दिवसांनी पुन्हा यावर सुनावणी होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.