नवी दिल्ली- कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर परेडनंतर शेतकरी आंदोलनाला अधिक धार देण्यासाठी संघटनांनी आज (दि.6) देशव्यापी 'चक्का जाम'ची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेससह अनेक पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. परंतु, चक्का जामचा परिणाम राजधानी दिल्लीत दिसणार नाही. आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितले की, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शनिवारी चक्का जाम होणार नाही. शेतकरी देशातील इतर भागात शांततापूर्ण पद्धतीने तीन तास राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर आंदोलन करणार आहेत.
संयुक्त किसान मोर्चाने म्हटले की, 'चक्का जाम' दरम्यान ऍम्ब्यूलन्स आणि स्कूल बससारख्या आवश्यक सेवांना रोखले जाणार नाही. 'चक्का जाम' शनिवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत केला जाणार आहे. भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 'चक्का जाम' होणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, या दोन राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही क्षणी दिल्लीला बोलावले जाऊ शकते, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता आंदोलन संपेल. त्यानंतर एक मिनीटभर आपापल्या गाड्यांचे हॉर्न वाजवण्यात येतील. इंटरनेट सेवा बंद असल्याने खूप अडचणी येत आहेत, अशी माहिती टिकैत यांनी दिली. देशभरातील नागरिकांनी आपापल्या गावी, आपापल्या भागात चक्का जाम आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहनही टिकैत यांनी केले.
असा असेल 'चक्का जाम'
- हा चक्का जाम दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत चालेल
- या दरम्यान राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जाम केले जातील. संयुक्त किसान मोर्चाने हा चक्का जाम देशव्यापी असल्याचे सांगितले आहे.
- या दरम्यान आपातकालीन आणि आवश्यक सेवांना रोखण्यात येणार नाही. त्यांना मार्ग उपलब्ध करुन दिला जाईल.
हेही वाचा- उबरकडून आता मद्याची डिलिव्हरी
- जर तुम्ही आज 12 ते 3 या वेळेत महामार्गावर प्रवास करणार असाल तर या चक्का जाम आंदोलनामुळे तुमची गैरसोय होऊ शकते.
- चक्का जाममध्ये अडकलेल्या लोकांसाठी भोजन आणि पाणी दिले जाईल असे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.
- प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे दिल्लीत चक्का जाम होणार नाही. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही हे आंदोलन होणार नाही. कारण या दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना दिल्लीतील आंदोलनस्थळी यावे लागू शकते. दिल्लीकडे जाणारे सर्व मार्ग खुले असतील.
- आंदोलनस्थळी शेतकरी इंटरनेट बंदीविरोधात प्रतीकात्मक विरोध करण्याची शक्यता आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.