नवी दिल्ली- कोरोना महामारीविरोधात सर्व जग संघर्ष करत आहे. कोरोनाचे थैमान कमी झाले असे वाटतानाच जगात विषाणूची दुसरी लाट आली. कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी लस हे एक प्रभावी शस्त्र आहे. अनेक देशांनी कोरोनाची लस तयार केली. मात्र, अनेकांना लसीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत भारताने मानवतेचे दर्शन घडवले. भारताने आपल्या देशातील लोकांना कोरोना लस देण्याबरोबरच इतर देशांनाही कोरोना लशींचा पुरवठा केला होता. भारताने 'वसुधेव कुटुंबकम' म्हणजे जग हेच कुटुंब असल्याचं म्हणत अनेक देशांना प्राथमिकतेने कोरोनावरील लस पुरवली होती. भारताच्या या कृतीचं जगभरातून कौतुक झालं. अनेक देशांच्या प्रमुखांनी भारताचे आभार मानले. पण, आता भारताच्या या लस डिप्लोमसीला झटका बसण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तीन देशांना पत्र लिहून कोरोनावरील लस देण्यास असमर्थ असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या देशांनी सीरमला कोरोना लस घेण्यासाठी पैसेही दिले होते.
सीरमने लस देण्यास असमर्थता दर्शवल्याने या देशांच्या लसीकरण मोहिमेमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. भारताच्या लसीकरण अभियानाच्या दृष्टीनेही ही चांगली बातमी नाही. भारताने आतापर्यंत 70 पेक्षा अधिक देशांना कोरोना लशींचा पुरवठा केला आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ब्राझील, मोरक्को आणि सौदी अरेबियाला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, सुरुवातीलाच खरेदी करण्यात आलेल्या लशींचा पुरवठा करण्यासाठी उशिर होऊ शकतो. ब्राझीलने भारताला 2 कोटी लशींची ऑर्डर दिली होती, त्यातील आतापर्यंत 40 लाख लशींचे डोस देण्यात आले आहेत. मोरक्कोनेही गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 2 कोटी लशींसाठी करार केला होता, पण आतापर्यंत 70 लाख लशींचाच पुरवठा करण्यात आला आहे. सौदी अरेबीयानेही 2 कोटी लशींसाठी करार केला होता, पण आतापर्यंत 30 लाख लशींचा पुरवठा करण्यात आलाय.
इमारतीला आग लागल्याने प्रोडक्शन झालं होतं ठप्प
ब्राझीलच्या फियोक्रूज इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात सीरमने लिहिलंय की, 'जगभरातील अनेक देशांना लशींचा पुरवठा करण्यासाठी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग सुविधा वाढवण्यास सुरुवात केली होती, पण एका इमारतीला आग लागल्याने मॅन्युफॅक्चरिंग आऊटपूटवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला लस पुरवठा करण्याची गॅरंटी देऊ शकत नाही.' अशाच प्रकारचे पत्र सौदी अरेबिया आणि मोरक्कोला पाठवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही देशाने या पत्राला उत्तर दिले नाही. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटच्या पुण्यातील एका इमारतीला जानेवारी महिन्यात आग लागली होती. त्यावेळी अदर पुनावाला यांनी लस निर्माण कार्यामध्ये यामुळे कोणताही परिणाम पडणार नसल्याचं म्हटलं होत. एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीला आग लागली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.