इम्फाळ : ईशान्य भारताचा दागिना अशी ओळख असलेल्या मणिपूरमध्ये सत्तेसाठी जोरदार चुरस होणार असल्याचे चित्र आहे. २०१७ मध्ये सर्वाधिक २८ जागा मिळूनही, २१ जागा मिळविणाऱ्या भाजपने प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी केल्याने हातातोंडाचा घास गमावलेला काँग्रेस पक्ष यंदा आशावादी आहे. भाजपच्या घटकपक्षांनीही भाजपविरोधात उमेदवार उभे केले असल्याने भाजपला ही लढत अवघड जाणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Manipur assembly election updates)
मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाबरोबरच लष्कराचा विशेषाधिकार कायदा रद्द करण्याची मागणी, राज्याच्या विकासासाठीच्या आर्थिक योजना हे मुद्दे भाजप आणि काँग्रेसच्या अजेंड्यावर आहेत. तर, नॅशनल पीपल्स पार्टी आणि नागा पीपल्स फ्रंट हे दोन प्रादेशिक पक्षही आपली मागण्यांची यादी घेऊन तयार आहेत.
त्यामुळे या पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांच्या मागण्यांचा विचार करणे, दोन्ही मोठ्या पक्षांना भाग आहे. राज्यातील एकूण स्थिती पाहता येथे निवडणूकपूर्व आघाडी होण्याची कोणतीही शक्यता नसून निवडणूकीनंतर मात्र सत्तेसाठी आघाडी होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
या निवडणूकीत दोन तृतियांश, म्हणजे ६० पैकी ४० जागा मिळवून आपलाच पक्ष विजयी होईल, असा दावा भाजपचे नेते चिदानंद यांनी केला आहे. राज्यात भाजप आणि नागा पीपल्स फ्रंट यांच्यातच खरी लढत असल्याचाही त्यांनी दावा केला आहे.
गेल्या वर्षभरात काँग्रेसमधून अनेक जण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. मात्र, सध्याचे सरकार भ्रष्टाचारी असल्याने काँग्रेसलाच मतदान होईल, असा विश्वास काँग्रेसचे आमदार एन. लोकेन सिंह यांनी व्यक्त केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.