भोपाळ: कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी जगभरात लस शोधली जात असताना नेत्यांकडून मात्र मांडण्यात येणारे तर्कवितर्क लोकांना गोंधळात टाकत आहेत. भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचे नाव यात आता जोडले गेले आहे. त्यांनी कोरोना आजाराला पळवण्यासाठी दररोज पाच वेळा हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी राजस्थानमधील बिकानेरचे खासदार आणि केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी पापड उपयुक्त ठरेल, असे हास्यास्पद विधान केले होते. मेघवाल यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता. यात 'भाभीजी पापड' हातात घेऊन ते झळकले होते. हा पापड खाल्याने अँटिबॉडिज तयार होतील असा दावा त्यांनी केला होता. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 लाखांच्या घरात पोहचला असताना भाजप नेत्यांकडून हास्यास्पद वक्तव्य करण्यात येत आहेत.
प्रज्ञासिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी आणि लोकांचे आरोग्य चांगले राहवे यासाठी अध्यात्मिक प्रयत्न करु. येत्या पाच ऑगस्टपर्यंत आपल्या घरी दररोज सायंकाळी सात वाजता पाच वेळेस हनुमान चालिसाचे पठण करावे. पाच ऑगस्टला सायंकाळी घरात दिवे लावावेत आणि श्रीरामाची आरती करुन अनुष्ठानाची समाप्ती करावी. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे. त्यात म्हटले की, मध्य प्रदेशचे सरकार कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत असून भोपाळमध्ये चार ऑगस्टपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
चार तारखेला लॉकडाउन संपेल. पाच ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होईल आणि तो दिवस दिवाळीप्रमाणे साजरा होईल. जेव्हा देशात एकाच आवाजात हनुमान चालीसाचे पठण होईल तेव्हा तो आवाज नक्कीच प्रभावी ठरेल आणि आपल्याला कोरोनापासून मुक्ती मिळेल. प्रज्ञासिंह यांच्या या आवाहनाची सध्या चर्चा होत आहे. यापूर्वीही मध्य प्रदेशचे प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा यांनी अयोध्येत राम मंदिराच्या कामास सुरवात झाल्यानंतर कोरोना कमी होईल, असे वक्तव्य केले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.