नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन आज अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आले. दोन टप्प्यांत २९ जानेवारी ते १५ मार्च या काळात झालेल्या या अधिवेशनात लोकसभेत विक्रमी ११४ टक्के व राज्यसभेत ९० टक्के कामकाज झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून व पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहांत गदारोळ केला. गोंधळ सुरु असताना एकही विधेयक मंजूर करुन घ्यायचे नाही, हे पथ्य सरकारने पाळले, असा दावा संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
केंद्रशासित पुदुच्चेरीसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी जायचे असल्याने विविध पक्षांच्या खासदारांच्या मागणीवरून ८ एप्रिलऐवजी अधिवेशन आज समाप्त झाल्याचे सरकारने सांगितले. सभापती ओम बिर्ला स्वतःच कोरोना संक्रमित झाल्याने लोकसभेत उपसभापतींच्या पॅनलमधील भर्तृहरी माहताब, रमादेवी व मिथुन रेड्डी यांच्यासह अन्य सदस्यांनी कामकाज चालविले. अधिवेशनात लोकसभेच्या २४ तर राज्यसभेच्या २३ बैठका झाल्या. लोकसभेत १३२ तास कामकाज झाले. अर्थसंकल्प व वित्त विधेयक २०२१ व्यतिरिक्त लोकसभेत १७ तर राज्यसभेत ३ विधेयके मंजूर झाली. दोन्ही सभागृहांत मंजुरी मिळालेल्या विधेयकाची संख्या १८ आहे. राज्यसभेत गोंधळामुळे कामकाजाचे २१ तास वाया गेल्याबद्दल तसेच सभागृहातील आणि संसदीय समित्यांतील घटणाऱ्या उपस्थितीबद्दल अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली व खासदारांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला.
मंजूर झालेली महत्त्वाची विधेयके
ज्येष्ठ खासदारांना राज्यसभेतून निरोप
राज्यसभेतून निवृत्त होणारे ज्येष्ठ खासदार वायलर रवी (कॉंग्रेस), के के रागीश (माकप) व पी व्ही अब्दुल वहाब (मुस्लिम लीग) यांना आज वरिष्ठ सभागृहाने निरोप दिला. या सदस्यांनी देशासाठी केलेले कार्य व त्यांची कारकीर्द स्मरणात राहील व ते येथून ‘रिटायर' झाले तरी सार्वजनिक जीवनात ‘टायर्ड'' झालेले नाहीत, असे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रवी यांच्यासह केरळमधील तिन्ही सदस्यांना निरोप देण्यात आला. रागीश उपस्थित नव्हते मात्र रवी व वहाब यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशातील ज्या तरुणांना संधी दिली त्यांत समावेश असलेले रवी यांनी काँग्रेस कार्यकर्ता ते केंद्रातील विविध मंत्रीपदे भूषविताना आलेले अनुभव मांडले. इंदिराजी यांचे नेतृत्व कार्यशैली याबद्दल वारंवार कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून येत होता. ते म्हणाले, की काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून आपण सार्वजनिक जीवनाला सुरवात केली. केरळच्या वायलर गावातून पुढे आलेल्या आपल्यासारख्या कार्यकर्त्याला काँग्रेसने १९७१ मध्ये सर्वप्रथम केरळ विधानसभेसाठी उमेदवारी दिली व नंतर हा प्रवास आजतागायत सुरू आहे. पक्षाने २ वेळा लोकसभेत व तब्बल ४ वेळा राज्यसभेत येण्याची तसेच केंद्रात अनेकदा मंत्रिपद भूषविण्याची संधी दिली.
वायलर हे सच्चे काँग्रेसवादी
वायलर रवी हे धर्मनिरपेक्षता व समाजवाद जगलेल्या सच्चा कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतात. कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व कायम आदरणीय राहिले, असे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. रागीश यांची विचारसरणी वेगळी असली तरी काम करण्याची त्यांची तळमळ उल्लेखनीय आहे, असे खर्गे म्हणाले.
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.