नवी दिल्ली- तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची लोकसभेची खासदारकी रद्द झालीये. त्यामुळे मोईत्रा यांच्या १४ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये वादळ आले आहे. संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीये. त्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार होत्या. नीतिमत्ता समितीच्या रिपोर्टनुसार, त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर मोईत्रा यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. संसदीय समितीच्या पॅनलचा शस्त्र म्हणून वापर करण्यात आलाय, असा आरोप त्यांनी केला. मोईत्रा या आक्रमक महिला खासदार म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या प्रवासाविषयी आपण जाणून घेऊया.
१९७४ मध्ये आसामच्या कक्षार जिल्ह्यात मोईत्रा यांचा जन्म झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कोलकातामध्ये झाले. उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेमध्ये गेल्या होत्या. त्यांनी आपल्या व्यावसायिक करियरची सुरुवात न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये जेपी मॉर्गन चेजसोबत एक गुंतवणूक बँकर म्हणून केली होती. पण, काम करत असताना त्यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'आम आदमी का सिपाही'अभियानातून प्रेरणा मिळाली होती.
मोईत्रा यांनी लंडनमधील आपला हाय-प्रोफाईल जॉब सोडला. त्यानंतर २००९ मध्ये काँग्रेसच्या युवा शाखेत त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसने त्यांना पश्चिम बंगालमध्ये पाठवलं. या ठिकाणी त्यांनी सुब्रत मुखर्जी यांच्यासोबत मिळून चांगलं काम करुन दाखवलं.
२०१० मध्ये मोईत्रा यांनी डाव्या विचारसरणीच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलकडून त्यांना तिकिट मिळण्याची अपेक्षा होती, पण २०११ च्या विधानसभा आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकिट दिलं नाही. तरी त्या संयमी राहिल्या. २०१६ मध्ये करीमपूर मतदारसंघातून उभे ठाकत त्यांनी विजय मिळवला आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली.
मोईत्रा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. पण, जोरदार भाषणे आणि वाद-विवाद कौशल्य बाळगणाऱ्या मोईत्रा यांच्याकडे पक्षाचा एक प्रमुख प्रवक्ता म्हणून पाहिलं जाऊ लागलं. २०१९ मध्ये त्यांना कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून संधी देण्यात आली. या ठिकाणी त्यांनी मोठा विजय प्राप्त केला. राजकारणात नवीन असल्या तरी आपल्या उत्स्फुर्त भाषणांमुळे त्या राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाल्या. त्या टीएमसीच्या एक लोकप्रिय नेत्या बनल्या.
ममता बॅनर्जी आणि मोईत्रा यांच्यामध्ये मतभेद असल्याचं अनेकदा समोर आलं. बॅनर्जींनी अनेकदा सार्वजनिक व्यासपीठावर त्यांच्यावर टीका केली. पक्षामधूनही अनेकदा त्यांना विरोध झाला. गेल्या दोन वर्षात तर त्या वादाच्या केंद्रस्थानी राहिल्या. त्यांच्या एका वक्तव्यामुळे बंगाली स्थानिक मीडियाने त्यांच्यावर बहिष्कार देखील टाकला होता. दरम्यान, मोईत्रा यांनी पुन्हा एकदा बहुमताने परत येण्याचा विश्वास व्यक्त केलाय. त्या भाजप विरोधात आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.