Annapaanvidhi Shameevarga Chana Dal
Annapaanvidhi Shameevarga Chana Dal 
फॅमिली डॉक्टर

अन्नपानविधी- शमीवर्ग चणाडाळ

डॉ. श्री बालाजी तांबे

चणे पचण्यासाठी शारीरिक व्यायाम, परिश्रम गरजेचे असतात. बैठे काम करणाऱ्यांनी चणे जपून खाणेच चांगले. वजन वाढण्यासाठी तरुण मंडळींनी व्यायामासहीत चणे खाण्याचा उपयोग होतो. 
 
प्रकृतीनुरूप सेवन केलेले अन्न आरोग्यरक्षणासाठी उत्तम असते. तसेच अन्नद्रव्यांची योग्य प्रकारे योजना केली तर ती उपचाराप्रमाणे उपयोगी पडते. आयुर्वेदशास्त्रातील अन्नपानासंबंधातील मार्गदर्शन आपण पाहतो आहोत. मागच्या वेळी आपण ताज्या हरभऱ्याची माहिती घेतली. आता चणे, हरभऱ्याची डाळ, फुटाणे वगैरे प्रकारांबद्दल जाणून घेऊ या. 
वाळलेले हरभरे म्हणजे चणे. 

 

चणको वातलः शीतो लघु रुक्षः कषायकः। 
विष्टम्भी मधुरो रुच्यो वर्ण्यो बल्यो ज्वरापहः।। 

चणे वात वाढवितात, मलावष्टंभ करतात, चवीला गोड व तुरट असतात, रुचकर असतात, वीर्याने शीत असतात, पचले असता ताकद वाढवितात. चण्याचे पीठ बाह्यतः वापरले असता वर्णासाठी हितकर असते. 

 

चणे पचण्यासाठी शारीरिक व्यायाम, परिश्रम गरजेचे असतात. बैठे काम करणाऱ्यांनी चणे जपून खाणेच चांगले. वजन वाढण्यासाठी तरुण मंडळींनी व्यायामासहीत चणे खाण्याचा उपयोग होतो. मूठभर चणे रात्रभर भिजत घालावेत. सकाळी व्यायाम केल्यावर भूक लागली असता भिजवलेले चणे नीट चावून खावेत. यामुळे वजन वाढते. मांसपेशी भरतात, शरीर सुदृढ होण्यास हातभार लागतो. 
 

चणे वाळूमध्ये भाजून घेऊन त्याचे पीठ केले तर ते पचायला थोडे हलके होते. वारंवार लघवी होण्याचा त्रास असेल तर असे पीठ व जव यांची भाकरी जेवणात ठेवण्याचा उपयोग होतो. 
भाजलेल्या चण्याचे पीठ दोन चमचे, वेखंडाची पूड पाव चमचा, ओव्याची पूड दोन-तीन चमचे हे सर्व एकत्र करून ठेवता येते. फार घाम येणाऱ्या व्यक्‍तीने स्नान करतेवेळी साबणाऐवजी हे मिश्रण उटण्याप्रमाणे लावण्याचा उपयोग होतो. 

 

चण्याचे पीठ म्हणजेच बेसन. पचनाचा विचार करूनच बेसनाची योजना करणे श्रेयस्कर. बेसनाला पर्याय म्हणून मुगाचे पीठ वापरता येते. 
 

हरभऱ्याची उसळ अधूनमधून करता येते. त्यातील वात कमी व्हावा यासाठी खोबरे लावून उसळ करता येते, दुपारच्या जेवणात खाता येते. 
 

हरभरे भट्टीत भाजले की त्याचे फुटाणे तयार होतात. हेच फुटाणे सोलले की त्याची पंढरपुरी डाळ तयार होते. ही डाळ पौष्टिक असते. प्रवासात वगैरे या डाळीपासून तयार केलेले लाडू वेळप्रसंगी भूक भागविण्यासाठी उत्तम असतात. गाडी लागण्याचा त्रास असणाऱ्यांसाठी प्रवासात फुटाणे किंवा डाळीचा लाडू खाणे हितावह असते. वारंवार सर्दी होत असणाऱ्यांनी रात्रीच्या जेवणानंतर दहा-बारा फुटाणे खाणे चांगले असे. फुटाणे खाल्ल्यावर वरून पाणी पिणे टाळावे. 
जेवणानंतर पोटात आग होण्याचा त्रास असला. मळमळत असले तर मूठभर फुटाणे किंवा पंढरपुरी डाळ चावून खाण्याचा उपयोग होतो. 

 

वीर्यपुष्टतेसाठी रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे पंढरपुरी डाळ व खडीसाखर हे मिश्रण नीट चावून खाता येते, वरून पाणी पिऊ नये. चण्याचे पीठ बाहेरून वापरले असता त्वचेसाठी उत्तम असते. साबणातील रासायनिक द्रव्यांचा त्वचेवर दुष्परिणाम होत असतो, या उलट चण्याचे पीठ व दूध वा मलई मिसळून तयार केलेले उटणे त्वचारोग असतानाही हितकर असते. त्वचा निरोगी राहावी, उजळावी, कंड वगैरे त्रास होऊ नयेत यासाठी चण्याच्या पिठाचे उटणे उत्तम होय. 
 

हरभऱ्याच्या झाडांवर पातळ सुती वस्त्र रात्रभर पसरून ठेवले तर सकाळी ते पूर्ण ओले झालेले असते. ते पिळून मिळालेला द्रव म्हणजे हरभऱ्याची आंब होय. नावाप्रमाणे ती अतिशय आंबट असते व पाचक असते. अपचन, पोटदुखी, पोट साफ न होणे वगैरे मंदाग्नीमुळे उद्भवणाऱ्या सर्व तक्रारींवर एक चमचा आंब दोन चमचे पाण्याबरोबर जेवणापूर्वी घेण्याचा उपयोग होतो. 
आंबेमध्ये भिजविलेले कोणतेही बी लवकर व चांगल्या प्रकारे उगवून येते असा अनुभव पूर्वीचे लोक सांगतात. 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT