जळगाव : शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणानंतर योग्य पद्धतीने हाताळणी होत नसल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. याबाबत संबंधित मक्तेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शहरातील कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी त्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. महापालिकेतर्फे त्याचा मक्ता काढण्यात आला आहे. एका कुत्र्याच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी मक्तेदारास ८८५ रुपये देण्यात येतात. नंदुरबार येथील नवसमाज बहुउदेशीय संस्थेस हा मक्ता देण्यात आला आहे. मेहरूण येथील टीबी हॉस्पिटल नजीक हे निर्बीजीकरण केंद्र आहे. कुत्र्याचे निर्बीजीकरण केल्यानंतर त्याला पाच ते सहा दिवस त्या केंद्रात ठेवून त्याला आहार द्यावा तसेच निर्बीजीकरणाची खूण म्हणून त्यांच्या कानाला त्रिकोण कट केला जातो. त्यानंतर जेथून त्याला पकडण्यात आले आहे. त्याच ठिकाणी त्याला सोडण्यात यावे अशी अट आहे. त्यानुसार मक्तेदारास शहरातील कुत्र्यांचे निर्बीजीकरण करावे लागत आहे.
दोन दिवसात कुत्रे सोडले जातात
महापालिकेचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी याबाबत महापालिकेत तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की कुत्र्याचे निर्बीजीकरण केल्यानंतर त्यांना पाच दिवस ठेवण्याची सक्ती आहे. याअंतर्गत त्याला आहारही द्यावा लागतो. मात्र मक्तेदार त्यांना पाच दिवस न ठेवता दोन दिवसात बाहेर सोडतात त्यानंतर त्याला योग्य आहार न मिळाल्याने हे कुत्रे मृत्युमुखी पडत आहे. आपल्या घराजवळील एका कुत्र्याचे निर्बीजीकरण केल्यानंतर त्याला तीन दिवसात त्या जागेवर आणून सोडले त्यानंतर कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मक्तेदाराची चौकशी व्हावी
निर्बीजीकरण करणाऱ्या मक्तेदाराची या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत दारकुंडे यांनी म्हटले आहे, की निर्बीजीकरणानंतर चुकीच्या पद्धतीने हाताळणीनंतर कुत्रे दगावत असतील तर संबंधित मक्तेदारावर कारवाई करणे आवश्यक आहे.
"शस्त्रक्रियेनंतर कुत्रे दगावलेले नाहीत, आम्ही या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याची जखम भरल्यानंतरच त्याला बाहेर सोडले जाते. काहींची जखम भरली नाही तर आम्ही त्यांना दहा ते बारा दिवस आमच्या निरीक्षणात ठेवतो. कोणता कुत्रा कधी आणला, त्याची शस्त्रक्रिया कधी झाली तो किती दिवस ठेवला याचे संपूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे आहे. आम्ही ते दाखवू शकतो." - गौतम शिरसाठ, मक्तेदार, नवसमाज बहुउद्देशिय संस्था, नंदुरबार.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.