Nana patole Nana patole
जळगाव

नानासाहेब, स्वबळावर लढायला ‘बळ’ कोठून आणणार?

नानासाहेब, स्वबळावर लढायला ‘बळ’ कोठून आणणार?

सचिन जोशी

जळगाव : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एकमेव समान कार्यक्रम डोळ्यांसमोर ठेवून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे खरेतर काँग्रेसला संजीवनी मिळाली. ती राज्यात मिळाली असली तरी जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील पक्षाच्या स्थितीबाबत वेगळे सांगायला नको. त्यातही जळगाव जिल्हा तर वाळीतच टाकलेला. मग, नाना पटोलेंनी कितीही स्वबळाची भाषा केली तरी संघटनेला लागतं ते ‘बळ’ कोठून आणणार, हा प्रश्‍न उरतोच. (jalgaon-news-congress-nana-patole-tour-jalgaon-district)

नाना पटोलेंच्या रूपात प्रदेश काँग्रेसला आक्रमक अध्यक्ष लाभला. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने त्यांचे कामही सुरू झाले. विदर्भातून त्यांनी दौरा सुरू करताना स्वबळाचा नारा दिला. पटोलेंच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुखांनी ‘स्वबळाची भाषा वापरली, तर लोक जोड्याने मारतील,’ असा इशारा देत समाचार घेतला. पक्षाचे प्रवक्ते व महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत यांनी जळगावात दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला मात्र मुख्यमंत्री विसरले, हा भाग निराळा. पण, पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याने राज्यभर राजकीय चर्चा मात्र नक्कीच रंगली.

आता हाच नारा घेत पटोले बुधवारी जळगाव जिल्ह्यात पाऊल ठेवताय. प्रदेशाध्यक्ष म्हटल्यावर जळगाव जिल्ह्यातील संघटनेचे ‘स्कॅनिंग’ त्यांनी नक्कीच करून ठेवले असणार. परंतु, हे स्कॅनिंग करताना त्यांच्यापर्यंत योग्य परिणाम व निदान पोचले असेल की नाही, याबद्दल मात्र शंका आहे. कारण, गेल्या तीन-चार दशकांपासून जिल्ह्यात व अलीकडच्या दोन दशकांत तर खानदेशातही काँग्रेसची जी वाताहात झाली, त्यामागील कारणे पटोलेंच्या आधीच्या अध्यक्षांनी शोधलेली नाहीत.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना नारायण राणेंनी साधारण १५ वर्षांपूर्वी जळगावचा दौरा केला, तेव्हा त्यांनी जिल्हा दत्तक घेण्याची केलेली घोषणा हवेतच विरली. नंतर प्रभारी म्हणून भाई जगताप, विनायक देशमुख या धुरिणांकडे जबाबदारी आली. पण, त्यांनी ‘आपला’ जिल्हा म्हणून काही प्रयत्नच केले नाहीत किंवा तसा प्रयत्न केला असेल तरी स्थानिक नेत्यांनी त्यांना ते करू दिले नाही, ही वस्तुस्थितीही नाकारता येणार नाही. मध्यंतरी महापालिका निवडणुकीदरम्यान तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अब्दुल सत्तारांनी जळगावची सूत्रे हाती घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना स्थानिक नेत्यांनी पळवून लावल्याचे बोलले गेले.

२०१४च्या आधी केंद्रात सलग दहा वर्षे आणि राज्यात पंधरा वर्षे सत्तेत असूनही जळगाव जिल्हा काँग्रेसच्या बाबतीत ‘मायनस’ होता. त्यामुळे २०१४ नंतर तर केंद्र व राज्यातही भाजपची सत्ता आल्याने तो ‘प्लस’ होण्याचे कारण नाही. संघटन असो की नेतृत्व, रणनीती असो की जागावाटप या सर्वच बाबतीत काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आलीय. निवडणूक कोणतीही असो, राष्ट्रवादीशी आघाडी केली की ऐनवेळी काँग्रेसचे नेतृत्व माघार घेते. २०१४ पर्यंत काँग्रेसकडे असलेली रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीने गिळली. २०१९ मध्येही जळगाव विधानसभेच्या बाबतीत तेच झाले आणि आता तर राष्ट्रवादीकडे एकनाथ खडसेंसारखा खमक्या नेता आल्यानंतर आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जिल्ह्यात काय येते, याबाबत शंकाच आहे.

सध्यातरी जिल्हा काँग्रेसची स्थिती एकमेव आमदारापुरती मर्यादित आहे. रावेरला शिरीष चौधरी काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांचा विजय काँग्रेसचा मानावा का, हा प्रश्‍न आहे. डॉ. उल्हास पाटलांचा थेट दिल्लीशी ‘कनेक्ट’ आहे. त्यांचे स्वतंत्र एम्पायर आहे. त्याचा लाभ घेणारे कार्यकर्तेही हजारो. पण, पक्षसंघटन केवळ त्यावर बांधता येत नाही. राज्यात अथवा केंद्रात विरोधात असताना आंदोलन करायचे म्हटले, की काँग्रेसकडून तेच नेहमीचे आठ- दहा चेहरे. त्यापलीकडे पक्ष पोचू शकलेला नाही, ही शोकांतिका.

अशा स्थितीत कार्यकर्त्यांना ‘बळ’ देता येईल; पण सर्वच नेते बनले तर त्यांना बळ कसे देणार? इतिहासात कधीकाळी झालेल्या फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनाचे वैभव किती दिवस मिरविणार? काँग्रेसचा पारंपरिक मतदार खानदेशात कायम असला तरी या मतदाराने कुणाच्या मागे जावे? असे एक ना अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. नाना पटोले या प्रश्‍नांची उत्तरे शोधतील, अशी अपेक्षा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT