जळगाव : वडली (ता. जळगाव) येथील एकाच कुटुंबातील पती-पत्नी व मुलाने विषारी द्रव्य प्राशन केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ६) सकाळी दहाला घडली. (Mass suicide attempt of farmer family jalgaon news)
तिघांपैकी वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, मुलगा गणेश आणि आई भारतीची प्रकृती गंभीर आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीचे उपचार सुरू आहेत.
वडली गावातील ग्रामस्थ आणि कधीकाळी प्रतिष्ठीत शेतकरी असलेले नारायण दंगल पाटील (वय ६६) यांनी पत्नी भारती (५५) आणि मुलगा गणेश (३३) यांच्यासोबत वास्तव्यास होते. मोठा मुलगा नाशिक येथे कामानिमित्त राहतो. काही दिवसांपासून पाटील कुटुंबीय प्रचंड तणावात होते. गुरुवारी (ता. ६) रोजी सकाळी सात ते आठच्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या तिघांनी घरातच विषारी द्रव्य प्राशन केले.
थोड्याच वेळात त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने त्याचा मित्र श्यामला फोन करून घरी येण्याचे सांगितले. श्याम घरी आल्यावर आई-वडिलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. श्यामने एकच आक्रोश करीत ग्रामस्थांना मदतसाठी पाचारण केले. ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
तिघांपैकी नारायण पाटील यांचा उपचारादरम्यान सकाळी दहाला मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ व नातेवाइकांनी जिल्हा शासकीय महाविद्यालयात गर्दी केली होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.
नापिकीतून कर्जबाजारी
वडली (ता. जळगाव) येथील नारायण पाटील कधीकाळी सधन शेतकरी म्हणून ओळखले जात होते. मोठा जमीन-जुमला, पशुधनासह शेतीचे बऱ्यापैकी उत्पन्न येत असल्याने खटल्याच्या घरातही सुख-समाधानाने सर्व भाऊ एकत्रच राहत होते.
मात्र कालांतराने वाटेहिस्से झाले, त्यात निसर्गाच्या अवकृपेतून सततची नापिकी, नुकसान, शेतीमालास भाव न मिळणे यातून बँक, सोसायट्यांच्या कर्जासह खासगी सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली पाटील कुटुंबीय पुरते गाडले गेले होते.
कुटुंबाची जेमतेम परिस्थिती त्यातही कर्जाचा तगादा याला कंटाळून पूर्ण कुटुंबाने एकत्रित विषप्राशन करून आयुष्य संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा, असे नातेवाईक व ग्रामस्थांनी माहिती सांगितले.
पत राखण्यासाठी घरासह शेतीचीही विक्री
शेतकी संघाचे माजी अध्यक्ष अजबराव दंगल पाटील, प्रेमानाना दंगल पाटील व नारायण दंगल पाटील यांची एकत्र कुटुंबात पूर्वी जवळपास पन्नास एकरावर शेती होती. वाटेहिस्से झाल्यावर कर्जबाजारीपणामुळे नारायण पाटील यांनी थोडी थोडी करून शेती विकली.
दहा वर्षांपूर्वी नारायण पाटलांच्या नावे सात-बारा पूर्ण नील झाला. अर्थात, शेतीचे चासही शिल्लक राहिले नाहीत. राहते घरही गेले. अखेर त्यांनी जैन कंपनीत चालकाची नोकरी पत्करली. मुलगा गणेशही फायनान्सची कामे करू लागला होता.
आत्महत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध
नारायण पाटील यांनी काही वर्षांपूर्वीच आपली शेतजमीन विकून टाकली असून, मोठा मुलगा नोकरीला आहे, तर लहानाही खासगी कंपनीत काम करत होता. गावात प्रतिष्ठित असलेल्या या कुटुंबाने पत राखण्यासाठी होत नव्हतं सगळ विकलं, तरी त्यांच्यावर कर्जाचा बोझा असण्याच्या विवंचनेतूनच ही घटना घडल्याचा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येऊन आत्महत्येच्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.