Transfer of vehicle hampered by inheritance process jalgaon news
Transfer of vehicle hampered by inheritance process jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : वारस लावण्याच्या प्रक्रियेने खोळंबले वाहनांचे हस्तांतर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : वाहन नावावर असलेल्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या वाहनावर वारसदाराचे नाव लावण्याची प्रक्रिया अलीकडच्या काळात अत्यंत क्लीष्ट झाली असून, त्यामुळे नागरिकांचा ताण नाहक वाढला आहे.

आधी केवळ प्रतिज्ञापत्रावर वारस लावण्याचे काम होत असताना, आता नोटरी व न्यायालयीन प्रक्रिया करावी लागत आहे. (Transfer of vehicle hampered by inheritance process jalgaon news)

यामुळे हजारो वाहनांचे हस्तांतरच खोळंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कुटुंबात ज्या व्यक्तीच्या नावावर वाहन असते, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर वारसहक्काने त्याची पत्नी अथवा मुलांच्या नावावर वाहन वर्ग होणे किंवा व त्या वाहनाच्या नोंदणी पुस्तिकेवर (आरसी बुक) वारसदाराचे नाव लावून घेणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे.

वाहन नावावर करण्यासाठी म्हणून लगेच नाही, परंतु अशा वाहनांची विक्री झाल्यावर ते वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करून देण्यासाठी वाहनास संबंधित मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाचे नाव लागणे आवश्‍यक असते. त्यासाठी आधी ज्यांच्या नावावर वाहन आहे, ती व्यक्ती गेल्यास त्याच्या वारसांनी शंभर रुपयांच्या मुद्रांक दस्तावर (स्टॅम्प पेपर) प्रतिज्ञापत्र सादर केल्यावर त्या वाहनास वारसाचे नाव लागत होते.

प्रक्रिया बदलली, ताण वाढला

वारसदाराचे नाव लागण्यासंबंधी प्रक्रियेत रस्ते परिवहन विभागाने बदल केल्यामुळे आता ही प्रक्रिया चांगलीच क्लीष्ट झाली आहे. आता एखादे वाहन त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसावर करायचे असेल, तर त्यावर पहिला हक्क वारस म्हणून पत्नीचा असतो. मात्र, पत्नीला प्रतिज्ञानपत्र, नोटरी, अशी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तिचे नाव त्या वाहनाच्या नोंदणी पुस्तिकेवर लागते.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

पत्नी नसेल आणि मुले किंवा मुली वारस, म्हणून असतील तर त्या सर्व वारसांना एकत्रित प्रतिज्ञापत्र, नोटरी, तसेच न्यायालयातही हजर राहून तेच वारस असल्याचे सिद्ध करावे लागते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात अनेक अडचणी येतात आणि त्यामुळे नागरिक हैराण होऊन वाहनाला वारस लावण्याच्या भानगडीपासून परावृत्त होऊन जातात.

कोरोनानंतर समस्या तीव्र

कोरोना काळात अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला. काही कुटुंबात पती-पत्नी असे दोघेही गेले. त्यांची मुले-मुली स्थानिक शहर-गावांमध्ये राहत नाहीत. नोकरी, व्यवसायानिमित्त ते अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत, अशा वारसांना वाहने त्यांच्या नावावर करून घेण्यासाठी इथल्या अनेक चकरा माराव्या लागतात. एकापेक्षा अधिक वारस असल्यास प्रत्येक वेळी सर्वांनाच हजर राहणे शक्य होत नाही. त्यामुळे वाहनांचे हस्तांतर करण्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे.

विक्री करणे झाले कठीण

वारस लावण्याची गरज तातडीने तशी भासत नाही. मात्र, जेव्हा दुचाकी अथा चारचाकी वाहनाची विक्री करायची असते, तेव्हा मात्र आधी वारस लावण्याची प्रक्रिया करावी लागते. त्यानंतरच या वाहनांची विक्री करणे शक्य होते.

चारचाकी वाहनांबाबत ही प्रक्रिया करणे अनिवार्य ठरते. कारण त्याशिवाय तिचा विमाही निघत नाही आणि कार आपण रस्त्यावर चालवूही शकत नाही. त्याची किंमती हजार-लाखांच्या घरात असल्याने त्यासाठी काही वेळ, पैसा खर्च करणे शक्य असते. मात्र, दुचाकींबाबत तसे होत नाही.

दुचाकींचे ‘वरच्या वर’ व्यवहार

दुचाकींचे व्यवहार या क्लीष्ट प्रक्रियेमुळे चांगलेच खोळंबले आहेत. जळगावसारख्या शहरात हजारो सेकंडहॅन्ड दुचाकींची विक्री दरवर्षी होते. मात्र, आपसांत विक्री झाली असेल आणि वारस लावण्याची भानगड असेल, तर त्या भानगडीत कुणी पडत नाही. विमा न काढता किंवा नूतनीकरण न करताच दुचाकी मोठ्या संख्येने विकल्या जातात.

हे व्यवहार वरच्या वर होतात. मुळात, सेकंडहॅन्ड दुचाकींचे व्यवहार तोकड्या रकमेत होतात. अशावेळी वारस लावण्याच्या प्रक्रियेवर दोन-चार हजार रुपये खर्च करायला कुणी तयार होत नाही. जेव्हा एखादा वाहन गुन्हा घडतो, तेव्हा मात्र असे व्यवहार कायदेशीर करण्याची निकड येते.

"वाहनांवर वारस लावण्याची प्रक्रिया अलीकडे क्लीष्ट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकाना त्याचा त्रास होत आहे. याउलट आता वाहनाच्या नोंदणीवेळी नॉमिनी म्हणून वाहन मालकाच्या वारसाचे नाव लावून घेतले, तर पुढच्या दृष्टीने ते सोईचे होईल." -ॲड. जमील देशपांडे, संचालक, देशपांडे ड्रायव्हिंग स्कूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT