साडवली : मुंबई -गोवा महामार्ग (mumbai goa highway) उत्तम दर्जाचा व लवकर व्हावा, यासाठी संगमेश्वर येथे काळ्या फिती लावून मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळी संगमेश्वर येथे काळ्या फिती लावून मानवी साखळी आंदोलन केले. कोकण हायवे समन्वय समिती प्रमुख संजय यादवराव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
गेली अनेक वर्ष रखडलेला मुंबई गोवा हा कोकण महामार्ग येत्या दीड वर्षात चांगला व लवकर व्हावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. कोकण हायवे महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. अनेकवेळा आंदोलने करुनही कोकणावासीयांना न्याय मिळाला नाही. यासाठी संजय यादवराव यांनी कोकण हायवे समिती स्थापन करून कोकणवासीयांसाठी हा लढा उभारला आहे. सरकारचे व संबंधित विभागांचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण कोकण हद्दीत हे मानवी साखळी आंदोलन छेडले जाणार आहे. ५ तारखेपासून हे आंदोलन सुरू झाले आहे.
पावसाचा जोर असूनही संगमेश्वर येथे हे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, भाजपा उपाध्यक्ष हरीभाई पटेल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विवेक शेरे, व्यापारी संघाचे अध्यक्ष बापू भिंगार्डे, भाजपा रत्नागिरीचे राजू भाटलेकर, युयुत्सु आर्ते, पप्पू सप्रे आदींनी यात सहभाग नोंदवला.
विविध मागण्या..
कोकण हायवे महामार्ग येत्या दीड वर्षात खड्डेमुक्त व दर्जेदार व्हावा, इंदापूर ते माणगाव हा टप्पा सहापदरी व्हावा, डोंगर पोखरण्याएवजी नदीतील गाळ काढून भरावासाठी वापरावा, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलआकारणी करू नये, सर्व्हीस रोड असावेत, बाजार सुविधा असावी, अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन छेडले जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.