due alkaline water
due alkaline water Sakal
कोकण

मालवण : क्षारयुक्त पाण्यामुळे किनारपट्टी बेजार

- प्रशांत हिंदळेकर

मालवण: जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात गेली काही वर्षे क्षारयुक्त पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. वाढत्या पर्यटनामुळे झालेला पाण्याचा प्रचंड उपसा, त्या प्रमाणात पाण्याचे न झालेले फेरभरण यामुळे किनारपट्टी भागातील विहिरींचे पाणी मचूळ, क्षारयुक्त बनत आहे. यामुळे दंतविकार, मूत्रविकारासह अन्य आजाराने किनारपट्टी भागातील नागरिक त्रस्त बनले आहेत. किनारपट्टी भागातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कसा करता येईल, यादृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे बनले आहे.

सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात काही वर्षांत क्षारयुक्त पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. सुरुवातीच्या काळात किनारपट्टी भागातील गावांमध्ये घरोघरी असलेल्या विहिरींमधून आवश्यक तेवढेच पाणी रहाटाच्या साहाय्याने काढले जात होते. माड, बागायतींनी शिंपण्यासाठीही आवश्यक तेवढ्याच पाण्याचा उपयोग नागरिकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन असल्याने विहिरींमधील पाणी पिण्यास योग्य होते.

जिल्ह्याची पर्यटन राजधानी म्हणून मालवणला ओळखले जाते. यात सुरुवातीच्या काळात पर्यटकांची संख्या मर्यादित असल्याने त्यांना आवश्यक पाणीपुरवठा हा निवासाच्या परिसरात असलेल्या विहिरीतील पाण्यावरूनच केला जात होता; मात्र गेल्या काही वर्षांत किनारपट्टी भागात वाढलेले पर्यटन लक्षात घेता निवासव्यवस्था, होम-स्टे, रिसॉर्टची निर्मिती झाली. पूर्वी उपलब्ध असलेल्या विहिरींमधील पाण्याचासाठा अपुरा पडू लागल्याने अनेक पर्यटन व्यावसायिकांनी कूपनलिका खोदल्या. किनारपट्टी भागात वाढलेले पर्यटन ही व्यवसायाच्या दृष्टीने चांगली बाब असली तरी कूपनलिकेच्या वाढत्या संख्येमुळे त्याचा विपरित परिणाम विहिरींच्या पाण्यावर झालेला दिसतो. किनारपट्टीलगतची गावे समुद्रापासून काही अंतरावर असल्याने भरती-आहोटीमुळे या विहिरींचे पाणी मचूळ तसेच क्षारयुक्त बनले आहे. पाण्यातील क्षार शरीरास आवश्यक असतातच; मात्र ते प्रमाणापेक्षा जास्त असल्यास त्याचे विपरित परिणाम शरीरावर होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत किनारपट्टी भागात दंतविकार, हाडांचे विविध आजार, किडनीचे तसेच मूत्रविकाराचे अनेक रुग्ण क्षारयुक्त पाण्याच्या वापरामुळे आढळून येत आहेत.

काय आहेत उपाय?

किनारपट्टी भागात वाढलेले पर्यटन लक्षात घेता कूपनलिकेच्या माध्यमातून क्षणात ४०० फुटांवरील पाणी खेचले जाते. मात्र, त्या प्रमाणात पाण्याचे फेरभरण होत नसल्याने पाण्याच्या फेरभरणासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पाण्याचा अनियंत्रित उपसा रोखायला हवा. उन्हाळ्याच्या काळात पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने ‘रेन हार्वेस्टिंग’सारखे प्रकल्प राबविण्याची गरज आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी नळपाणी योजना राबविण्यावर भर द्यावा.

क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे आजार

‘फ्लोरीसिस’ म्हणजेच दंतविकार, यात दात ठिसूळ होणे, दातांवर पिवळा थर येणे, डाग पडणे, हाडे ठिसूळ होणे, त्वचारोग, केस गळणे, अंगावर पुरळ येणे, मूत्राक्षयाचे आजार. दर एक हजार माणसांमागे आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ४ ते ५ टक्के.

जार वापरावर भर

किनारपट्टी भागात पर्यटन वाढत आहे. मात्र, क्षारयुक्त पाण्याच्या समस्येमुळे पर्यटकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर व्यावसायिकांचा भर असतो. यासाठी बिसलेरी तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे प्युरिफायर पाण्याच्या जारचाच सध्या वापर होत असल्याचे चित्र आहे. पर्यटन व्यावसायिकांना बिसलेरीसह शुद्ध पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध करून घेणे शक्य असले तरी अन्य सर्वसामान्यांना असे पाणी नियमित वापरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

किनारपट्टी भागातील वाढलेले पर्यटन, त्यामुळे पाण्याचा वाढलेला प्रचंड उपसा यामुळे काही वर्षांत क्षारयुक्त पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे. यामुळे अनेक नागरिक दंतविकार, किडनी, हाडांच्या आजारांना बळी पडत आहेत. नळपाणी योजना व्हायला हवी. पाण्याचा काटकसरीने वापर, पाण्याचे फेरभरण करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT