नांदगाव (सिंधुदुर्ग) - अद्याप थंडीची चाहूल न लागल्याने आंबा, काजू पीक अडचणीत आहेत. सध्या काही प्रमाणात पालवी दिसत असली तरी थंडी नसल्याने मोहोर कधी धरणार याची चिंता बागायतदारांना सतावत आहे.
यंदाच्या पावसाळ्याने विशेष करून कोकणातील शेतकऱ्यांना झोडपून काढले. भातपीक आडवे करून वरती तांडव केले. वर्षाची पोटगी मातीत गेली. या ओल्या दुष्काळातून शेतकरी उभारी घेत असतानाच डिसेंबर संपला तरी अजूनही थंडीचा पत्ता नसल्याने बागायती शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आंबा, काजू तरी चार पैसै मिळवून देतील, या आशेवर शेतकरी आहे; मात्र डिसेंबर गुलाबी थंडी घेऊन आलाच नाही. नवीन वर्ष तरी थंडी घेऊन येऊ द्या आणि फळबागा चांगल्या मोहरून नवीन वर्षात घोसाने फळे येऊन शेतकरी राजाच्या पाठीचा कणा पुन्हा ताठ होऊ दे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
ओला दुष्काळ काय असतो, याचे कटू अनुभव सरते वर्ष सिंधुदुर्ग वासियांना देवून गेले. लांबलेल्या पावसाळ्याने होत्याचे नव्हतं केलं. इतर वेळी कुठे कापूस पेटतो, कुठे ऊस पेटतो त्यावर आंदोलन होतात. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कोकणात दौरे केले, मदतीची आश्वासन मिळाले, पंचनामे झाले; मात्र मदत कितीजणांच्या खात्यात जमा झाली यावर प्रश्नचिन्हच आहे. थंडीअभावी आता नवे संकट बागायतदारांना अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. आंबा, काजु चांगले येण्यासाठी कडक थंडीची गरज असते. बागायतदारांना आशा बागायती शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे झाडे चांगली फुटतात. म्हणजेच मोहोर चांगला येतो आणि आंब्याची कणी थंडीमुळे चांगली येते आणि काजू बागायतीही चांगलं बाळसं घेतात आणि उत्पादन समाधानकारक येते. वर्ष संपून गेले तरी थंडीचा पत्ता नसल्याने पुढील हंगामासाठी चिंता सतावत आहे. २०२०ची पहाट गुलाबी थंडी घेऊन येईल, अशी आशा आता येथील बागायतदार बाळगून आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.