रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणेच्या वतीने (एसीबी) कोकण परिक्षेत्रात २०२० या वर्षात ४४ सापळे लावून ६६ लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये सहा विभागांतील सर्वाधिक २५ गुन्हे ठाण्यात दाखल आहेत तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमाण सर्वांत कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभाग यात अव्वल आहेत. त्या पाठोपाठ पोलिस कर्मचारी लाचच्या सापळ्यात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाचखोरांना रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहेत. ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा विभागांचा कोकण परिक्षेत्रात समावेश होतो. २०१९ मध्ये कोकण परिक्षेत्रात १०९ गुन्हे दाखल झाले होते.
कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी घट झाली आहे. भ्रष्टाचाराला आळा बसावा, म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृतीसह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा २०२० मध्ये ठाणे परिक्षेत्रात एकूण ४४ सापळे लावण्यात आले. यामध्ये एक अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये वर्षभरात ६६ लाचखोर सापळयात अडकले. २५ लाचखोरांना ठाण्यातून अटक झाली. त्या पाठोपाठ पालघर विभागात सहा, नवी मुंबई आणि रायगड विभागात प्रत्येकी चार, रत्नागिरीत तीन आणि सिंधुदुर्गमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली.
"लाचखोरी ही समाजाला कॅन्सरसारखी पोखरत आहे. ज्याची अडवणूक होते, त्या नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे येणे अपेक्षित आहे. अनेकदा चिरीमिरीसाठी कामाची अडवणूक होते; पण नागरिकांनीही तक्रार केली नाही तर एसीबीलाही कारवाई करणे अवघड होते. संबंधित विभागप्रमुखांनीही कारभार पारदर्शक ठेवावा."
- डॉ. महेश पाटील, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र
हेही वाचा - रत्नागिरीत 6 ग्रामपंचायतीत उलथापालथ
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.