kokan Sakal
कोकण

अवकाळीचे संकट, सिंधुदुर्गात आंबा, काजू बागा धोक्यात

फळपिकांवर अस्मानीची टांगती तलवार

एकनाथ पवार

वैभववाडी : अवकाळीचे अस्मानी संकट पुन्हा एकदा जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांवर घोंघावत आहे. विपरित वातावरणात पालवी आणि मोहोर स्थितीत असलेल्या बागांचे संरक्षण करताना बागायतदारांची कसोटी लागणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी या संकटामुळे आंबा, काजुसह जिल्ह्यात एकूणच फळपिकाचे अर्थकारण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही महिन्यांपुर्वी झालेल्या जागतिक तापमान वाढ विषयावरील जागतिक परिषदेत भविष्यात तापमान वाढीचा फटका किनारपट्टीच्या भागांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आता तज्ज्ञांचा अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. सतत ढगाळ वातावरण, तापमानवाढ, अवकाळी पाऊस, गारपीट अशा विविध तापमानवाढीचे दुष्परिणाम दिसुन येत आहेत. या बदलत्या वातावरणाने आतापर्यंत उपजिविका आणि उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या कोकणातील आंबा, काजू, कोकम, सुपारी या फळबागांचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे. त्यामुळे या बागांवर अवलंबुन असलेल्या बागायतदारांचे अर्थकारण बिघडताना दिसत आहे.

सिंधुदुर्गातील अधिकत्तर लोकांचे अर्थकारण आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकम या पिकांवर आहे; परंतु ही पिकेच बदलत्या वातावरणामुळे अडचणीत येताना दिसत आहेत. सर्वाधिक लागवडक्षेत्र असलेला काजू आणि आंबा ही पिके सतत धोक्यात येत आहेत. गेल्यावर्षी आंबा, काजू पिकांचे अवकाळीने मोठे नुकसान केले. तौक्ते वादळात अखेरच्या टप्प्यात असलेला आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले; परंतु आता पुन्हा एकदा पावसाचे संकट उभे आहे.

सध्या आंबा आणि काजूला पालवी आणि मोहोर येण्याची प्रकिया सुरू आहे. बागायतदार देखील पूर्ण क्षमतेने बागांमध्ये काम करीत असताना आता अवकाळीचे संकट उभे आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यानुसार अवकाळी पावसाला सुरूवात देखील झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी अवकाळी पाऊस यामुळे आंबा, काजुला आलेल्या मोहोराचे संरक्षण कसे करावे? या चिंतेत बागायतदार आहेत. या वातावरणात दोन्ही फळपिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे.

कीटकनाशकांच्या फवारण्यांचा खर्च देखील वाढणार आहे. अलीकडे कीटकनाशकाच्या वाढलेल्या दरामुळे बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. त्यातच बदललेल्या वातावरणामुळे फवारण्यांची संख्या देखील वाढणार आहे. सलग पाच-सहा दिवस पाऊस पडल्यास आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान होणार असुन बागायतदारांचे अर्थकारण देखील बिघडणार आहे. एकीकडे कोरोनामुळे गेली दोन वर्षे काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले. त्यातच गेल्यावर्षी अवकाळीचा फटका बसला. आता पुन्हा एकदा अवकाळीच्या संकटाने बागायतदारांची चिंता वाढविली आहे.

जिल्ह्यातील बागायतींचे उत्पादनक्षम क्षेत्र (हेक्टरमध्ये)

काजू - ७२ हजार हेक्टर

आंबा - ३० हजार ३०० हेक्टर

नारळ - १८ हजार ९० हेक्टर

सुपारी - १ हजार २४६ हेक्टर

पावसाचा मोठा फटका

- आंबा, काजू, कोकम, सुपारी बागा धोक्यात

- थंडी गायब झाल्याने पालवी, मोहोर प्रक्रियेवर परिणाम

- कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

- आंबा हंगाम लांबण्याची चिन्हे

- शेतकरी, बागायदारांमध्ये चिंता

ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.हे वातावरण निवळताच काजु बागायतदारांनी झाडांचे निरीक्षण करावे.टी मॉस्कीटो किवा अन्य कीडरोगांचा प्रादुर्भाव पाहुन कृषी विभागाच्या सल्ल्याने फवारण्या घ्याव्यात.पाऊस पडण्याची शक्यता असेल तर फवारण्या घेऊ नये.

- प्रा. विवेक कदम, काजुपिक अभ्यासक, कृषी महाविद्यालय सांगुळवाडी

दोन - तीन दिवस थंडी पडली. अजुनही काही दिवस थंडी पडली असती तर आंब्याला मोहोर फुटण्यास प्रारंभ झाला असता; परंतु थंडी थांबली. सध्या २५ टक्के आंबा पिकाला पालवी आणि २५ टक्के मोहोर आहे. ५० टक्के झाडांना अजुन पालवी आणि मोहोर नाही. सध्याचे वातावरण आंबा पिकाला बाधक आहे. त्यामुळे पालवी आणि मोहोर संरक्षणासाठी गरजेनुसार फवारण्या घ्याव्यात. या वातावरणामुळे आंबा हंगाम देखील लांबण्याची शक्यता आहे.

- डॉ. दामोदर विजय, प्रभारी अधिकारी, आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर देवगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray Statue Vandalised : मीनाताईंच्या पुतळ्यावर रंगफेक; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबईत तणाव वाढला

Pune News : अंगणवाड्यांची धोकादायक स्थिती; बालशिक्षण धोक्यात; दाटीवाटीत मुलांचे शिक्षण, सुरक्षिततेचा प्रश्न

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Robbery At SBI Bank : स्टेट बँकेच्या शाखेवर पिस्तूल, चाकूने धमकावून दरोडा, आठ कोटींचा ऐवज लुटला, पोलीस घटनास्थळी दाखल

Navratri 2025 Do's and Don'ts: शारदीय नवरात्रात काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT