84463
शेतकरी विमा भरपाईसाठी २० ला ‘धरणे’
सतीश सावंत ः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडणार आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ ः जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार आणि भाताचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत विम्याची भरपाई मिळणे अपेक्षित होते. परंतु, केंद्र आणि राज्याने अद्यापही विमा कंपनीला रक्कम भरणा केलेली नाही. त्यामुळे सोमवार (ता. १८) पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा न झाल्यास बुधवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी आणि जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून दिला.
श्री. सावंत यांनी आज येथील विजय भवनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘जिल्ह्यातील भात, आंबा, काजू पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी एक रुपयांमध्ये विमा भरणा करा, असे जाहीर केले होते. जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरणा केली. मात्र, ऑक्टोबर २०२४ मध्ये जिल्ह्यातील केवळ २०० शेतकऱ्यांना शासनाच्या नियमावर आधारित भरपाई मिळाली. त्यानंतर हेक्टरी ४५० रुपये विमा रक्कम सुरू करण्यात आली. यासाठी वेगवेगळे निकषही लावण्यात आले.’
ते पुढे म्हणाले, ‘जिल्ह्यातील ६ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरवला. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने दुर्लक्ष केला आहे. जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांनी नोव्हेंबरमध्ये विमा रक्कम भरणा केली आहे. जवळपास ३४ हजार काजू बागायतदारांनी ११ कोटी भरणा केले आहेत, तर १० हजार आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी ४ कोटी रुपये भरणा केले आहेत. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्याचबरोबर आंबा काजूला खत देण्यासाठी पैसेही नाहीत. विमा भरूनही हवामानावर आधारित विमा रक्कम भरपाई पोटी मिळत नाही. मुळात जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, वाढते तापमान लक्षात घेता ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, केंद्र व राज्याने विमा कंपनीसाठी अजूनही पैसा भरणा केलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्यांनी विमा भरण्यात केला आहे, त्यांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत अशांनी मतभेद आणि पक्षभेद विसरून २० ला होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे.’
चौकट
एकत्रित बैठक न झाल्याने फटका
काजूला हेक्टरी एक लाख वीस हजार रुपये आणि आंब्यासाठी हेक्टरी एक लाख ७० हजार रुपये ही रक्कम ३० जूनपूर्वी मिळणे आवश्यक होती. मात्र, विमा भरपाई रक्कम अद्यापही जाहीरही केलेली नाही. यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत तीन वेळा पक्षाच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने भेट झाली. परंतु, विमा कंपनी आणि कृषी विभाग यांची एकत्रित बैठक अद्यापही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.