swt914.jpg
90384
सिंधुदुर्गनगरीः येथील जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयाला माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी भेट देत समस्यांबाबत चर्चा केली.
रिक्त पदे न भरल्यास आंदोलन
ठाकरे शिवसेनेचा इशाराः भूमि अभिलेखच्या कामकाजाबाबत नाराजी
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ः भूमि अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत आणि सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत; अन्यथा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिला.
जिल्ह्यातील नागरिकांकडून वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर श्री. नाईक व श्री. सावंत यांनी आज जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयाला भेट दिली. जिल्ह्यात सध्या तब्बल ७० टक्के अधिकारी व कर्मचारी पदे रिक्त आहेत. आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यांना तालुका भूमि अभिलेख अधिकारीच नाहीत, तर केवळ दोन अधिकाऱ्यांवर आठ तालुक्यांचा भार आहे. त्यामुळे जमीन मोजणी व नकाशे मिळविण्याची कामे रखडली असून, नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. महसूल विभागाचे संगणकीकरण झाल्याचे शासन सांगत असले तरी त्यात अनेक त्रुटी असल्याने अडचणी वाढल्या आहेत. एजंटांचा सुळसुळाटही मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप करण्यात आला. जर महिन्याभरात शासनाने रिक्त पदे भरून कामकाज सुरळीत केले नाही, तर जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयावर ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा नाईक व सावंत यांनी दिला.
या भेटीत भूमि अभिलेखचे उपअधीक्षक विठ्ठल गणेशकर व विनायक ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. यात कार्यालयातील विविध समस्या मांडण्यात आल्या. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बंडू ठाकूर, अतुल बंगे, बाळू पालव, सिद्धेश राणे, अमित राणे, संजय रावले आदी उपस्थित होते.