rat12p21.jpg
91048
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
---------
संधी मिळाली की, महिला त्याचं सोनं करणारच
वैदेही रानडेः प्रसंगी लहान मुलीला ठेवून लोकांना भेटावे लागे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : काम टाळणे ही एक वृत्ती आहे, ज्यात पुरुष व स्त्रिया दोघांचाही समावेश होतो. नोकरदार महिलांना खूप आव्हाने असतात; पण आपण समानता म्हटली की, आपल्याला काम टाळणे शक्य नसते. आपल्याला अधिकार, कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. एक महिला म्हणून माझ्या स्त्रीत्वाचा उपयोग माझ्या फायद्यासाठी न करणे हे जर तुम्ही पाळलं ना तर समानता चालत तुमच्याकडे येणारच. महिलेला संधी मिळाली की, ती त्याचं सोनं करणारच, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आयोजित महिला परिषदेत त्या बोलत होत्या. विधानसभा निवडणूक आणि भयानक पूरपरिस्थिती अशा प्रसंगावेळी माझी मुलगी लहान असतानाही मला लोकांना भेटायला जावे लागत होते. त्या वेळी माझी भूमिका मी उत्तमरितीने पार पाडली. त्यामुळे आजही तिथले लोक मला भेटतात आणि विचारपूस करतात, असा अनुभव त्यांनी सांगितला.
रानडे म्हणाल्या, महिलांना बाळंतपणासाठीची रजा मिळण्यासाठी १९६१ला कायदा झाला. त्यानुसार १२ आठवड्याची पगारी रजा मिळत होती; परंतु काहीवेळा महिलांचे वेगवेगळे प्रश्न असतात. त्या वेळी बाळाला घरी ठेवून नोकरीवर हजर होणे कठीण होते. त्यामुळे २०१७ मध्ये कायद्यात बदल झाला व जास्त रजा मिळू लागली आहे. महिला बचतगटांची मोठी चळवळ उभी राहिली व पापड, लोणची, मसाले यांसह अन्य उद्योगांतून महिला सक्षम होत आहेत. भारतात आतापर्यंत एक महिला पंतप्रधान, दोन राष्ट्रपती आणि १५ महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. आरक्षणामुळे पहिली महिला एमपीएससीची बॅच होती त्यात मी सुद्धा होते. १९९७ ला मी डेप्युटी कलेक्टर झाले. अर्थात, आमच्या बॅचला एमपीएससीमध्ये त्यावर्षी पहिल्या येणाऱ्या दोघीही महिलाच होत्या. आम्ही ९ जणी अधिकारी झालो. २००१ मध्ये आम्ही महिला अधिकाऱ्यांचा दबावगट केला. आम्ही मंत्र्यांना भेटलो. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, पती-पत्नी अधिकारी असल्यास किमान पदभार एकाच जिल्ह्यामध्ये मिळावा, असे मंजूर झाले. २००६ मध्ये महिलांना मुख्य पदं मिळत नव्हती. त्या वेळी महसूलमंत्री नारायण राणे यांनी महसूल खात्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एकेक पद महिलांना दिले होते.
या प्रसंगी रानडे यांनी महिलांच्या हक्क, अधिकार व सुरक्षेकरिता राज्यघटनेतल्या तरतुदींची माहितीसुद्धा सविस्तरपणे दिली. शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय, महिला बचतगटांचे सक्षमीकरण, उमेद योजनेचा फायदा झालेली काही उदाहरणेसुद्धा त्यांनी सांगितली. महिलेच्या नावावर घर, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, स्वस्थ नारी सक्षम परिवार या योजनासुद्धा महत्त्वाच्या आहेत.
चौकट १
रत्नागिरीला पार्श्वभूमी
स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक, आर्थिक विकास हे हातात हात घालूनच जात असतात. लिंग समानता ही आपल्या घरापासूनच सुरू व्हायला हवी. रत्नागिरी जिल्ह्यात साक्षरता ही पूर्वीपासूनच जास्त आहे. जिल्ह्याने पाच भारतरत्न दिले आहेत. त्यामुळे येथे चांगले काम उभे राहिले. महिला सरपंच असलेल्या गावांमध्ये समस्या समजून त्या सोडवण्याकडे कल दिसतो, असे रानडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.