91704
जनता दरबारावर टीका म्हणजे जनतेला फसवणं
मनिष दळवींचा ठाकरे गटावर पलटवार; तुम्ही सत्तेत असताना काय केलं?
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १५ ः जनता दरबार घेण्यासाठी जनतेत शिरून प्रश्न ऐकण्याची हिंमत आणि पारदर्शकता लागते. ज्यांनी आपल्या सत्ताकाळात कधी गाव, तालुका वा जिल्हा पातळीवर जनता दरबार घेतला नाही, त्यांनी यावर टीका करणं म्हणजे जनतेला फसवण्यासारखं आहे, अशा शब्दांत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी ठाकरे शिवसेनेच्या काही नेत्यांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिले.
श्री. दळवी यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब यांच्यासाहित पदाधिकारी उपस्थित होते. श्री. दळवी यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांनी घेतलेल्या जनता दरबारावर टीका करणाऱ्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘नीतेश राणे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हास्तरावर जनता दरबार झाले. जिल्हा स्तरावर जनता दरबार घेत असताना प्रत्येक तालुक्यापर्यंत जावे असा निर्णय त्यांनी घेतला. कारण लांबच्या तालुक्यातील लोकांना जिल्ह्यापर्यंत येणे खर्चिक होते. प्रवासाचा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच अडचणी येतात. या अडचणी त्यांना होऊ नये, तालुक्यापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात म्हणून पालकमंत्री यांनी वेंगुर्ला तालुक्यातून तालुकास्तरीय जनता दरबाराना सुरुवात केली. खरंतर त्यांनी यासाठी वेंगुर्ला तालुक्याची निवड केली म्हणून वेंगुर्लेवासीयांच्या वतीने आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. या जनता दरबारामध्ये मोठ्या संख्येने वेंगुर्लेवासीय उपस्थित होते.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘ठाकरे शिवसेनेच्या काही नेत्यांनी या जनता दरबारबद्दल काही वक्तव्य केली. त्यांनी या गोष्टीचा विचार करावा की त्यांच्या सत्ता स्थानाच्या काळात त्यांनी कधीही अशा प्रकारचा ना जिल्ह्यस्तरावर कोणता जनता दरबार घेतला ना तालुकास्तरावर, ना गावपातळीवर. कारण जनता दरबार घेण्यासाठी जनतेमध्ये थेट जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्याला न्याय देण्यासाठी, संवाद करण्यासाठी हिंमत, पारदर्शकता असावी लागते. ज्या नेत्याची प्रशासनावर स्वतःची पकड आहे तोच नेता अशा प्रकारे जनता दरबार घेऊ शकतो. जनता दरबारात तालुक्यातून आलेल्या अनेक प्रश्नांचे त्याठिकाणी तात्काळ निर्णय लागले. जनतेचे अधिकाधिक प्रश्न सुटावेत, प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे गतिमान पद्धतीने सर्व प्रश्नांना वाचा फुटावी या दृष्टिकोनातून या जनता दरबाराचे आयोजन होते. जनतेचे प्रश्न सुटत असतील तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. आपले अपयश पुढे येईल, अशा प्रकारची भीती जर ठाकरे शिवसेनेच्या लोकांना वाटत असेल तर तो त्यांचा दोष आहे. या जनता दरबाराबद्दल सामान्य जनता समाधान व्यक्त करत आहे. या सर्वांच्या माध्यमातून लोकाभिमुख कारभार करण्याचा पालकमंत्री यांचा मानस आहे.
----------------
७० टक्के प्रश्न मार्गी
प्रशासकीय बाबींमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी असतात. पालकमंत्री यांनी निर्देश दिल्यानंतर त्या निवेदनावर कोणत्या प्रकारची कार्यवाही करणे अपेक्षित आहे किंवा कोणती कार्यवाही करणार आहेत याची उत्तरे त्याठिकाणी समोरासमोर संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेतली आहेत. त्यामुळे या जनता दरबारामध्ये ७० टक्के पेक्षा जास्त निवेदनांचे प्रश्न त्याचठिकाणी मार्गी लागले. उर्वरित काही प्रकरणात जी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे ती झाल्यानंतर ती प्रक्रिया पुढील १५ दिवसांत नक्की मार्गी लावली जाईल. पालकमंत्र्यांच्या कार्यालयातूनही याबाबत पाठपुरावा केला जात आहे, असेही श्री. दळवी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.