swt305.jpg
95599
नीरजा, डॉ. सुनीलकुमार लवटे
सावंतवाडीत २८ डिसेंबरला साहित्य संमेलन
प्रा. प्रवीण बांदेकरः कवयित्री नीरजा अध्यक्ष, डॉ. सुनीलकुमार लवटे उद्घाटक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने पुरस्कृत केलेल्या व येथील श्रीराम वाचन मंदिर या संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व लेखिका नीरजा यांची निवड केली आहे. तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे उपस्थित राहणार आहेत. येत्या २८ डिसेंबरला येथील आरपीडी हायस्कूलच्या कविवर्य केशवसुत सभामंडपात हे संमेलन होणार आहे, अशी माहिती संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत प्रा. प्रवीण बांदेकर यांनी दिली.
कवयित्री नीरजा यांचे ''निरन्वय'', ''वेणा'', ''स्त्रीगणेशा'', ''निरर्थकाचे पक्षी'', ''मी माझ्या थारोळ्यात'' आदी सहा संग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय ''ओल हरवलेली माती'', ''पावसात सूर्य शोधणारी माणसे'' आदी चार कथासंग्रह, ''थिजलेल्या काळाचे अवशेष'' ही कादंबरी तसेच अनेक ललित लेख संग्रह, संपादने वगैरे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
उद्घाटक डॉ. लवटे यांचे ''खाली जमीन वर आकाश'' हे आत्मचरित्र गाजले आहे. शिरोडा व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील ज्ञानपीठ विजेते लेखक वि. स. खांडेकर यांच्या स्मृती जतन करणारी भव्य दालने उभारण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. ''खांडेकरांचे वैनतेय'' साप्ताहिकातील लेखन संपादित करून त्याचे चार खंड त्यांनी प्रकाशित केले आहेत. याशिवाय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङमयाचे दहा खंड त्यानी संपादित केले आहेत.
यावेळी संमेलनाच्या विविध समित्या गठित करण्यात आल्या. संमेलनाची रुपरेषाही निश्चित करण्यात आली. या बैठकीसाठी प्रा. बांदेकर, सतीश लळीत, उषा परब, गोविंद काजरेकर यांच्यासह वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर, सुमेधा धुरी, कल्पना बांदेकर, विजय ठाकर, वाय. पी. नाईक, मंजिरी मुंडले, विनया बाड, अभिमन्यू लोंढे, राजेश मोंडकर, विजय देसाई, राजू तावडे, रुपेश पाटील उपस्थित होते.