कोकणातील शेतकऱ्यांना
तत्काळ भरपाई द्या
चिपळूण : कोकणात झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे भातशेती आणि नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देत शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात कोकणातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे त्वरित करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पावसामुळे शेती उद्ध्वस्त झाली असून, भातशेती आणि नाचणीची पिकं पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यामुळे त्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे, असे चिपळूण विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी सांगितले. तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांनी सांगितले, गावोगावी पंचनामे करताना प्रत्येक गावाला एक अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी नियुक्त करावा जेणेकरून पंचनामे लवकर पूर्ण होतील आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल. या वेळी झालेल्या चर्चेत विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम यांनी चिपळूण शहरातील शंकरवाडी, मुरादपूर, गोवळकोट, उक्ताड, खेंड परिसर, मतेवाडी शेतकरी उपस्थित होते.
गणपतीपुळ्यात
दीपोत्सवाची सांगता
रत्नागिरी ः तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री मंदिरात कोजागिरी ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत नित्यनेमाने सायंकाळी होणाऱ्या श्रींची आरती व दीपोत्सवाची सांगता बुधवारी (ता. ५) उत्साहात झाली. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीक्षेत्र गणपतीपुळे स्वयंभू श्री लंबोदरच्या मंदिरात कोजागिरी ते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच अश्विन ते कार्तिकी पौर्णिमा अशा कालावधीत नित्यनेमाने सायंकाळी मंदिरात होणाऱ्या दीपोत्सवाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला उत्साहात झाली. या वेळी श्रींचा गाभारा मुख्यमंदिर तसेच मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गावरील मोरया या ठिकाणच्या त्रिपुरांची विधीवत पूजाअर्चा होऊन असंख्य तेलवातीच्या दिव्यांनी, पणत्यांनी, समयांनी सर्व परिसर प्रकाशमय केला जातो. सायंकाळी सात ते साडेसात या वेळेत श्रींची सामूहिक आरती, मंत्रपुष्पांजली प्रार्थना करण्यात आली.
दोन एक्स्प्रेसना
अखेर थांबे मंजूर
खेड : कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एर्नाकुलम–निजामुद्दिन एक्स्प्रेस आणि हिसार–कोईमतूर एक्स्प्रेस या दोन गाड्यांना नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग व कणकवली स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या निर्णयानुसार एर्नाकुलम–निजामुद्दिन एक्स्प्रेस आता सिंधुदुर्ग स्थानकात संध्याकाळी ७.०८ वा. दाखल होऊन ७.१० वा. मार्गस्थ होईल. परतीच्या प्रवासात, ७ नोव्हेंबरपासून ही एक्स्प्रेस सकाळी ७.२० वा. सिंधुदुर्गला पोहोचून ७.२२ वा. पुढे निघेल तर हिसार–कोईमतूर एक्स्प्रेस कणकवली स्थानकात रात्री ९.४६ वा. येईल आणि ९.४८ वा. पुढे निघेल. परतीच्या प्रवासात ८ नोव्हेंबरपासून ही गाडी सकाळी ६.३० वा. कणकवलीत थांबणार आहे. या दोन्ही थांब्यांमुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सोईस्कर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.