rat17p1.jpg-
11241
धनंजय चितळे
संतांचे संगती.....लोगो
इंट्रो
संत एक कल्पवृक्षासारखे असले तरी आपल्याला जे हवे ते देण्यापेक्षा जे आपल्या हिताचे आहे तेच ते देत असतात. मागण्याची बुद्धी शुद्ध करणे आणि नंतर हळूहळू ती मागण्याची इच्छाच काढून टाकणं, हे संतांचे सगळ्यात मोठे कार्य आहे. चिंतामणी हे असे रत्न आहे की, जे हातात घेऊन आपण आपल्या मनातील चिंता व्यक्त केली ते रत्न आपल्याला चिंतामुक्त करते. संतांचे वैशिष्ट्य असे की, ते स्वतः चिंतामुक्त असतात आणि आपणासारिखे करिती तत्काळ या न्यायाने ते आपल्या भक्तांनाही चिंतामुक्त करतात आणि मग चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी, अशीच भक्ताची अवस्था होते.
- धनंजय चितळे, चिपळूण
---------------------------
संत हे कल्पवृक्षासारखे
चला कल्पतरूंचे आरव। चेतनाचिंतामणींचे गाव।
बोलते जे अर्णव। पियुषांचे।।
ज्या झाडाखाली बसले असता आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, त्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात. सर्वसाधारणपणे झाड स्वतःला मुलांच्या माध्यमातून जमिनीला जखडून घेते, ते एका जागी स्थिर असते; पण संत हे असे कल्पतरू आहेत की, ते एका ठिकाणाहून अन्यत्र जाऊ शकतात. म्हणूनच ते चला कल्पतरू आहेत. या सृष्टीतील प्राणीमात्रांची काळजी घेण्यासाठी एक कल्पवृक्ष कसा बरे पुरेल? म्हणून संत हे कल्पतरूंची बाग आहे. कल्पतरू आणि संत यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे कल्पवृक्षाखाली बसून जी इच्छा केली जाईल ती योग्य किंवा अयोग्य हे न पाहता कल्पवृक्ष ती पूर्ण करतो. एक माणूस उन्हातून चालता चालता थकला आणि एका झाडाच्या सावलीत विसावला, त्याने मनात विचार केला इथेच पाणी मिळाले तर किती बरे होईल? योगायोगाने तो कल्पवृक्ष होता त्यामुळे त्या माणसाला पाणी मिळाले. पुढे क्रमशः अन्न, पलंग, पाय चेपायला दासी या सर्वच गोष्टी त्याच्या इच्छेप्रमाणे प्रकट झाल्या; पण जेव्हा त्याने विश्रांती घेताना विचार केला की, मी मागतो ते इथे येते म्हणजे इथे भुताटकी तर नाहीना त्याबरोबर त्या दासीचे रूपांतर भुतांमध्ये झाले आणि त्या माणसाच्या मनात आले की, हे भूत मला खाऊन तर टाकणार नाहीना, त्या क्षणी त्याची ती इच्छाही पूर्ण झाली. वाचकहो, या कथेचा भावार्थ आपल्या ध्यानात आला असेलच. जसे एका कल्पतरूने काम होणार नाही तसे एका चिंतामणीनेही सर्व प्राणिमात्रांचे कार्य सिद्धी जाणार नाही, हे ध्यानी घेऊन श्री ज्ञानेश्वर माऊली चिंतामणीच्या गावाची मागणी करतात. संत हे दगडासारखे कठोर नाहीत आणि निर्जीवही नाहीत म्हणून मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त। या वचनाप्रमाणे त्या कोमल अंतःकरणाच्या संतांसाठी श्री ज्ञानेश्वर माऊली चेतना असा शब्दप्रयोग करतात. या संतांचे बोलणे कसे असते तर श्री ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे,
साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ।
शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे ।।
म्हणजेच त्यांचे बोलणे सत्य असते, मृदू असते, मोजके असते आणि ऐकणाऱ्याला आनंद देणारे असे रसाळ असते. त्यांचे वक्तृत्व म्हणजे जणू अमृताचे फवारेच असतात. सर्वच संतांनी सत्पुरुषांच्या वक्तृत्वाचा याच प्रकारे गौरव केलेला दिसतो. श्री तुकाराम महाराज म्हणतात, खरा सज्जन कसा असतो0 तर
अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो।।
म्हणजेच जो मनाने निर्मळ आहे रसाळ वाणीने बोलणार आहे त्याने गळ्यात माळ घातली काय न घातली काय तो वैष्णवच आहे. यापुढील ओव्यांमध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलींनी संतांना चंद्र, सूर्य यांच्याबरोबरही तोलले आहे त्याची चर्चा आपण पुढील भागात करूया.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.