१८०१२
मिऱ्या बंधाऱ्याचे काम कासवगतीने
प्रलंबित कामांसाठी ८० कोटींची गरज ः बसरा स्टार जहाजाचे ३० टक्के काम शिल्लक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : शहराच्या किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या साडेतीन किमीच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, आता हे काम महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. त्यावर आतापर्यंत १०९ कोटी खर्च झाले आहेत. उर्वरित कामाला गती देण्यासाठी निधीची कमतरता भासत आहे. ठेकेदाराला तातडीच्या २५ कोटींची गरज आहे. किनाऱ्यावर अडकलेले बसरा स्टार जहाज हटवले असून, त्याचे ३० टक्केच काम शिल्लक आहे. निधीची कमतरता भासत असल्याने कामाचा वेग मंदावल्याला पत्तन विभागाने दुजोरा दिला.
मिऱ्या बंधाऱ्याच्या कामात नगरपालिका रस्ता आणि वनविभागाच्या जमिनीचा मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केल्याने हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. बंधारा समुद्रात आत घेतल्यामुळे किनारपट्टीची साधारण ४० फूट जादा जागा मिळाली आहे. यामुळे भविष्यातील धूप थांबवण्यास मदत होणार आहे. रखडलेला ३०० मीटरचा टप्पा आणि जहाजाचा अडथळा दूर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ३०० मीटर अंतरावरील काम बसरा स्टार जहाजामुळे रखडले होते. जहाज तिथून हटवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मुरूगवाडा येथील १२०० मीटरचे काम अद्याप बाकी असून, जहाज हटल्याने आता या कामालाही गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सुरवातीला १८९ कोटी मंजूर केले होते. त्यापैकी १०९ कोटी निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधीची कमतरता भासत असून, त्यासाठी काम पूर्ण करण्यासाठी सध्या २५ कोटी रुपयांच्या तातडीच्या निधीची आवश्यकता आहे.
संपूर्ण बंधारा आणि उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी एकूण ८० ते ९० कोटींच्या निधीची अडचण भासत आहे. मिऱ्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यास परिसरातील या किनारी भागाला समुद्राच्या लाटांपासून संरक्षण होणार आहे. सध्या प्रशासनाचे लक्ष उर्वरित १२०० मीटरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लागून राहिले असून, कामाला गती मिळण्यासाठी निधीची गरज आहे.
दृष्टिक्षेपात
प्रकल्पासाठी १८९ कोटी मंजूर
आतापर्यंत १०९ कोटी खर्च
बंधाऱ्याचे ६० टक्के काम पूर्ण
बसरा स्टारमुळे ३०० मीटर रखडले
२५ कोटींची तातडीने आवश्यकता