चाळीशी ओलांडली... पण सनई अजून दूरच
मुलींच्या शहरांकडील ओढा; कोकणातील तरुणांपुढे उभा विवाहाचा प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः कोकणात सध्या एकीकडे लग्नाचे सनईचौघडे वाजण्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे एक गंभीर सामाजिक पेच उभा राहिला आहे. यंदा जुलै २०२६ पर्यंत लग्नाचे तब्बल ४९ शुभ मुहूर्त आहेत; मात्र लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने ग्रामीण भागातील हजारो तरुणांचे भवितव्य अधांतरी पडले आहे. मुलींचे वाढते शिक्षण आणि शहरांकडचा ओढा यामुळे कोकणातील गावे आता ‘तरण्या बापांच्या’ प्रतीक्षेत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
दहावी-बारावीच्या निकालात कोकण नेहमीच अव्वल असते, त्यातही मुलींचे यश लक्षणीय आहे; मात्र, हेच शिक्षण आता स्थलांतराचे मुख्य कारण ठरत आहे. उच्चशिक्षणासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरांत गेलेल्या मुली तिथेच नोकरीनिमित्त स्थिरावत आहेत. शहरी जीवनशैलीची सवय झाल्यामुळे पुन्हा गावाकडच्या मातीत, शेती-बागायतीत रमण्याची मानसिकता आता उरलेली नाही. लग्नाचा विषय निघाल्यावर मुलींची पहिली अट ‘मुलगा शहरात असावा’ ही असते. पूर्वी कोकणातील मुलगी कोकणातीलच शहरात राहणाऱ्या मुलाशी लग्न करायची; मात्र, आता हा कल बदलला असून, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि परप्रांतीय तरुणांशी विवाह करण्यासही मुली पसंती देत आहेत. परिणामी, गावातील वडिलोपार्जित संपत्ती आणि बागायती सांभाळणारा तरुण मात्र उपवरच राहत आहे.
कोकणातील एका सरासरी वाडीत ३०-३५ घरे असतील तर त्यातील १० ते १२ तरुण लग्नाचे वय (३५-४० वर्षे) ओलांडूनही अविवाहित आहे. याउलट, त्याच वाडीत लग्नासाठी उपलब्ध असलेल्या मुलींची संख्या जेमतेम १-२ असते. ‘आमचे पुढे काय?’ हा प्रश्न आता गावातील कट्ट्यांवर चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. वैफल्यग्रस्त होऊन अनेक तरुणांनी आता लग्नाचा विचारच सोडून दिला आहे. पूर्वी कोकणात लग्नासाठी कारवार (कर्नाटक) भागातून मुली आणल्या जात; मात्र, गेल्या काही वर्षांत या व्यवहारात फसवणुकीचे प्रकार वाढल्याने आणि कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाल्याने आता हा पर्यायही तरुणांना असुरक्षित वाटू लागला आहे. तज्ज्ञांच्या मते, १७-१८ वर्षांपर्यंत मुला-मुलींचे प्रमाण समतोल असते; मात्र त्यानंतर मुलींचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होते. यावर एकमेव उपाय म्हणजे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती. जर कोकणातच उद्योग, आयटी पार्क किंवा सेवाक्षेत्राचा विस्तार झाला तर मुलींना शहरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही आणि गावातील सामाजिक समतोल टिकून राहील.
---
चौकट
असे आहेत लग्नाचे मुहूर्त
फेब्रुवारी : १० दिवस
मार्च : ६ दिवस
एप्रिल : ५ दिवस
मे: ९ दिवस
जून : ४ दिवस
जुलै : ६ दिवस
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.