चिपळूण–मिरवणे रस्त्यावर
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी
चिपळूण, ता. ८ ः चिपळूण–मिरवणे या महत्त्वाच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून संबंधित प्रशासकीय यंत्रणा याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. हा रस्ता सध्या प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत आरसा बनला असून, खराब रस्त्यामुळे प्रवासी, शाळकरी मुले आणि शेतकऱ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे. दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना या मार्गावरून गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर परिस्थितीबाबत ‘करणी सेना भारत’चे मंत्री दीपक पाटील यांनी प्रशासनावर कडक शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘‘चिपळूण–मिरवणे रस्ता म्हणजे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा जिवंत पुरावा आहे. लोकप्रतिनिधींनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून प्रशासनावर दबाव निर्माण करावा आणि प्रवाशांच्या या हालचालींतून सुटका करावी.’’
रस्त्याची केवळ थातूरमातूर डागडुजी न करता तातडीने दर्जेदार दुरुस्ती करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दीपक पाटील यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही सूचकपणे दिला जात आहे.