पुणे : गणेशोत्सव जोमाने पार पडला आणि आता नवरात्रोत्सव चालू आहे. त्याच्या सोबतीला पुणे शहरात पुढील काही दिवस चक्क क्रिकेट महोत्सव रंगणार आहे. कारण विश्वकरंडक स्पर्धेचे पाच सामने पुण्यात होणार आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश लढतीने या क्रिकेट महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशला डोके वर काढू द्यायचे नाही, हेच धोरण भारतीय संघाचे आहे. सलग तीन सामने जिंकणारा भारतीय संघ आता विजयी चौकारासाठी सज्ज झाला आहे.
गेल्या ४ पैकी ३ एकदिवसीय सामन्यांत बांगलादेश संघाने भारतीय संघाला पराभवाचा झटका दिला आहे. गुरुवारी होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय संघ एकाच उद्देशाने मैदानात उतरणार आहे, ते म्हणजे बांगलादेश संघाला कोणतीही संधी द्यायचीच नाही.
बांगलादेश संघ नेमका भारतीय संघाला नडतो, हमखास चांगली कामगिरी करतो. मग उपाय एकच उरतो, तो म्हणजे पहिल्या तीन सामन्यांत केला तसा एकदम दणकट खेळ करायचा. समोरच्या संघाला पुरून उरण्याची जिद्द ठेवायची.
रोहित शर्माचा संघ तेच करायच्या तयारीत आहे. त्यातून बांगलादेश संघाचा आधारस्तंभ कप्तान आणि जातिवंत अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन दुखापतीने बेजार आहे. बांगलादेश संघाचे प्रशिक्षक शाकीबला तंदुरुस्त करायला धडपडत आहेत. अर्थात शाकीब खेळला तरी तो पूर्णपणे झोकून देईल असे वाटत नाही. त्याचासुद्धा फायदा भारतीय संघाला होईल.
बांगलादेश संघाने २००७ सालच्या विश्वचषक सामन्यात भारताला पराभूत केले, तेव्हापासून त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. कप्तान शाकीब, अनुभवी मुश्फीकर रहीम आणि गुणवान मेहदी हसन मिराज या तीन खेळाडूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर बांगलादेश संघ वाटचाल करत आला आहे.
मग कधी लिटन दास, कधी डावखुरा वेगवान गोलंदाज शोफीरूल आणि कधी फसवी मध्यमगती गोलंदाजी करणारा मुस्तफीजूर चांगली कामगिरी करून या तिघांना साथ देत आले आहेत. तरीही भारतीय संघाची सध्याची ताकद आणि लय बघता गुरुवारचा सामना जिंकणे रोहित शर्माच्या सहकाऱ्यांना कठीण जाणार नाही.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर चांगली खेळपट्टी तयार करायला मेहनत घेतली गेली आहे. मोसमाचा हा पहिला मोठा सामना असल्याने खेळपट्टी चांगलीच ताजी आहे. या भागात भरपूर पाऊस झालेला असल्याने खेळपट्टी एकदम ठणठणीत कोरडी नसेल असा अंदाज आहे.
तिकिटांसाठी अजूनही मागणी
पुण्यात विश्वचषकाचे पाच सामने होणार आहेत. त्यातील पहिलाच सामना भारतीय संघाचा असल्याने क्रिकेट रसिकांच्यात चांगलाच उत्साह आहे. इतर कोणत्याही भारतीय संघाच्या सामन्याप्रमाणेच सर्व तिकिटे विकली गेल्याचा फलक कधीच झळकला असल्याने बरेच क्रिकेट रसिक अजूनही कसेही करून तिकीट मिळवायला धडपडत आहेत.
संघात बदलाची शक्यता कमी
खेळपट्टीचा स्वभाव बघता संघात बदल केला जाण्याची शक्यता कमी आहे. भारतीय संघाला मोहंमद शमीला संधी देणेही कधी ना कधी गरजेचे होणार आहे. नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम गोलंदाजी करेल, ते ताज्या खेळपट्टीचा फायदा घ्यायला. वेगवान गोलंदाजांना सामना चालू झाल्यावर पहिला तास मदत होण्याची शक्यता बोलली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.