RCB vs SRH | IPL 2024 Sakal
IPL

RCB vs SRH: आयपीएल इतिहासातच नाही, तर टी20 क्रिकेटमध्ये कधीही घडलं नाही, ते बेंगळुरू-हैदराबाद सामन्यात घडलं!

RCB vs SRH, IPL 2024: आयपीएल २०२४ मध्ये झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदाराबाद सामन्यात तब्बल ५४९ धावा झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे हा सामना ऐतिहासिक ठरला.

Pranali Kodre

RCB vs SRH, IPL 2024: ४० ओव्हर, ५४९ धावा अन् ८१ बाऊंड्रीज...हेच आकडे सामना कसा झाला हे सांगण्यास पुरेसे आहेत. रॉयल चॅलेजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमने-सामने होते.

तसं चिन्नास्वामी स्टेडियम लहान आहे, त्यामुळे त्यावर हमखास चौकार-षटकारांची बरसात झालेली पाहायला मिळते, परंतु आरसीबी-हैदराबाद सामना म्हणजे बॅट्समनसाठी अक्षरश: स्वर्ग होता, मात्र बॉलर्ससाठी मरण.

आधीच आरसीबीच्या संघात बॉलर्ससाठी मारामारी आहे, या सिजनला तर संघाने कितीही धावा उभारल्या तरी त्या कमीच पडतायेत. याही सामन्यात काही वेगळं चित्र नव्हतं, बेंगळुरूला २६२ धावा करूनही विजयासाठी २५ धावा कमी पडल्या. कारण हैदराबादने पहिल्यांदा बॅटिंग करताना तब्बल २८७ धावा उभारल्या होत्या.

आयपीएलमधील सर्वात मोठा स्कोअर त्यांनी केला. विशेष म्हणजे हैदराबादने याच सिजनला मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावांचा स्कोअर केला होता. पण दोनच आठवड्यात त्यांनी त्यांच्याच विक्रम मोडला नवा इतिहास रचला.

एवढंच नाही, तर या संपूर्ण सामन्यात तब्बल ५४९ धावा झाल्या, ज्या एका टी२० सामन्यात झालेल्या सर्वात जास्त धावा आहेत. त्यामुळे फक्त आयपीएलच नाही, तर टी२० क्रिकेटच्या इतिहासातही आरसीबी-हैदराबाद सामन्याची नोंद झाली.

सामन्याबद्दल सांगायचं झालं तर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली होती. कारण अगदी साधं होतं. मिळेल ते लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. कारण सुमार बॉलिंगपुढे समोरचा संघ मोठ्या धावा करणार हे आता जवळपास आरसीबी संघाला माहित झालंय.

आरसीबीनं प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले. त्यांनी ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या दोन अनुभवी खेळाडूंना खेळवलंच नाही, तर लॉकी फर्ग्युसनला पदार्पणाची संधी दिली. दर्जेदार बॉलिंगची आधीच कमी भासत असतानाच मॅक्सवेल आणि सिराजही बाहेर असल्याने हैदराबादच्या सलामीवीरांनी फायदा उचलला.

ट्रेविस हेडने सुरुवातीपासूनच आरसीबीच्या बॉलर्सचा समाचार घेण्यास सुरुवात केली. हेडने यंदा हैदराबादच्या वरच्या फळीला स्थैर्य दिलंय, ज्याची कमी गेल्यावर्षी त्यांना भासली होती. हेडनं अवघ्या २० चेंडूत या सामन्यात अर्धशतक पूर्ण केलं.

त्याने आणि अभिषेक शर्माने मिळून ८ ओव्हरच्या आतच संघाला १०० धावांच्या पुढे नेलं होतं. पण अभिषेकला ३४ धावांवर टोप्लीने बाद केलं. पण तरी हैदराबादच्या धावांचा ओघ कमी झाला नाही कारण हेडला साथ द्यायला आला स्फोटक फलंदाज हेन्रिक क्लासेन.

या दोघांनीही नंतर आरसीबीच्या गोलंदाजांवर प्रहार सुरू केले. बघता बघता अवघ्या ३९ चेंडूच हेडनं शतकाला गवसणी घातली. हे त्याचं १७ व्या आयपीएल हंगामातलं सर्वात वेगवान शतक ठरलं. पण शतकानंतर त्याला फर्ग्युसनने माघारी धाडलं.

पण तरी क्लासेन एका बाजूने उभा होताच त्यानेही २३ चेंडूत अर्धशतक चोपलं. पण तोही ३१ चेंडूत ६७ धावांवर बाद झाला. असं असलं तरी युवा अब्दुल सामदनं अखेरच्या षटकांमध्ये ४ चौकार आणि ३ षटकार मारत फक्त १० चेंडूत ३७ धावा चोपल्या. त्यामुळे हैदराबादने आयपीएलमधला सर्वात मोठा स्कोअर केला.

आरसीबीच्या रिस टोप्ली, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि विजयकुमार वैशाख या बॉलर्सने ५० पेक्षा जास्त धावा खर्च केल्या. त्यामुळे हा देखील एक विक्रमच झाला.

आता २८८ या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हणजे आरसीबीला तशी सुरुवात करणंही गरजेचंच होतं. आणि ही गरज ओळखूनच विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडले होते. १२-१३ च्या धावगतीनं त्यांनीही धावा जमवल्या. ६ ओव्हरमध्येच जवळपास आरसीबीने ८० धावा केल्या होत्या.

पण इथेच माशी शिंकली आणि विराटला मार्कंडेने क्लिन बोल्ड केलं. विराट २० बॉलमध्ये ४२ धावा करून बाद झाला. पण तरी फाफ डू प्लेसिस मैदानात होता. त्यानेही खणखणीत अर्धशतक केलं.

पण त्याच्याच एका सरळ शॉटवर उनाडकटचा हात बॉलला लागला आणि तो बॉल स्टंपवर आदळला. त्यावेळी जॅक्स क्रिजच्या बाहेर होता आणि तो रनआऊट झाला. ९ व्या षटकात मार्कंडेने रजत पाटीदारलाही माघारी धाडलं.

यानंतर मधल्या षटकांमध्ये हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने कमालीचा स्पेल टाकला. त्याने १० व्या ओव्हरमध्ये फाफ डू प्लेसिस आणि सौरव चौहान यांचा अडथळा दूर केला. तेव्हा अर्धा आरसीबी संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

आरसीबीपासून विजय अजून खूप दूर होता. पण मैदानात उभा होता दिनेश कार्तिक. त्याने त्याचा दांडपट्टा चालवायला सुरुवाच केली. त्याला आधी महिपाल लोमरोरने साथ दिलेली पण लोमरोरला १५ व्या षटकात कमिन्सने बोल्ड केलं. तरी कार्तिक हार मानण्यास तयार नव्हता. त्यानं २३ चेंडूत अर्धशतक केलं.

त्याच्या बॅटमधून जशा धावा निघत होत्या, तसं हैदराबादचं टेंशन वाढत होतं अन् आरसीबीच्या आशा टिकून राहत होत्या. पण तरी शेवटी मोठ्या धावांचं समीकरण जुळणं शक्य झालं नाही. त्यातच कार्तिक १९ व्या ओव्हरमध्ये टी नटराजनच्या बॉलिंगवर विकेटकिपर क्लासेनकडे झेल देत बाद झाला. कार्तिक ३५ चेंडूत ८३ धावा करून लढला. पण अखेर आरसीबी हरली.

आरसीबीला २६२ धावाच करता आल्या. कदाचीत मॅक्सवेल असता तर, कदाचीत सिराज असता तर थोडंफार चित्र वेगळं दिसलं असतं का? असा विचार आरसीबी चाहते करत असतील, पण सामन्यात जर-तरला महत्त्व नसतं. शेवटी निकाल हैदराबादच्याच बाजूने लागला आणि त्यांना महत्त्वाचे २ पाँइंट्सही मिळाले.

आरसीबीच्या पदरी मात्र इतकी लढत देऊनही निराशाच आली. आरसीबी पहिल्या टप्प्यातील ७ सामन्यांपैकी ६ वा सामना हरले. त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास आता आणखी बिकट झालाय हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT