सोलापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधकामासाठी आता लाभार्थींना ५० हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे. पूर्वीच्या एक लाख २० हजार रुपयांच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यातील १५ हजार रुपये घरावर सौरउर्जा यंत्रणा उभारणीसाठी असणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत १० एप्रिलपर्यंत एक लाख ६० हजार ५४४ घरकुले बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहेत. पण, अनुदान कमी, मोफत वाळू मिळत नसल्याने व बांधकाम साहित्य महागल्याने ५० टक्के लाभार्थींची घरे अजूनही अपूर्णच असल्याबद्दल ‘सकाळ’ने ‘ऐंशी हजार घरकुलांना प्रतीक्षाच’ या मथळ्याखाली खुद्द ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्ह्यातही ५० टक्क्यांपेक्षा कमी काम झाल्यावर प्रकाश टाकला होता. दरम्यान, जिल्हा दरसुचीनुसार २६९ चौरस फूट घरकूल बांधकामासाठी सव्वादोन लाख रुपयांचा खर्च होतो.
तरीपण, सध्या घरकूल बांधणीसाठी एक लाख २० हजार रुपयांपर्यंतच अनुदान मिळत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर शुक्रवारी ग्रामविकास विभागाने वाढीव अनुदानाचा शासन निर्णय काढला आहे. राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकूल योजनेतील लाभार्थींनाही वाढीव अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अनुदानाशिवाय ही राज्य हिश्शातील वाढीव रक्कम असणार आहे. या निर्णयामुळे अपुऱ्या अनुदानामुळे थांबलेली घरकुले पूर्ण होतील, अशी आशा आहे.
प्रत्येक लाभार्थीस मिळणार आता २.०९ लाख रुपये
घरकूल लाभार्थींना आता मूळ अनुदान एक लाख २० हजार रुपये, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ९० दिवसांच्या मजुरीपोटी २७ हजार रुपये व स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधणीसाठी १२ हजार रुपये दिले जातात. आता ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार ५० हजार रुपये वाढीव मिळणार आहेत. असे प्रत्येक लाभार्थीस आता दोन लाख नऊ हजार रुपये मिळतील.
आता मोफत वाळूचा प्रश्न सुटण्याची आशा
घरकूल बांधकामासाठी लाभार्थीस पोलिस व महसूल प्रशासनाने कारवाईत जप्त केलेली वाळू व ज्या ठिकाणी लिलाव सुरू आहेत तेथील वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण, अजूनही सुधारित वाळू धोरण निश्चित न झाल्याने शेकडो वाळू ठेक्यांचे लिलाव होऊ शकलेले नाहीत. त्याचा देखील घरकुलांच्या कामांवर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य बेघर लाभार्थींना शासनाच्या त्या सुधारित धोरणाची प्रतीक्षा आहे.
‘सकाळ’मधील वृत्तामुळे तातडीने झाला निर्णय
घरकूल लाभार्थींना वाढीव ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा झाली होती, पण शासन निर्णय झालेला नव्हता. आता शुक्रवारी ग्रामविकास विभागाने त्यासंदर्भातील आदेश काढला आहे, त्याचे श्रेय्य ‘सकाळ’ला जाते.
- रतिलाल साळुंखे, समन्वयक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.