Board Exam
तात्या लांडगे
सोलापूर : पूरस्थितीमुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचे नियमित शुल्कासह अर्ज करण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची मुदत उद्या (मंगळवारी) संपणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ६ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्यांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. पूरस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ दिली आहे.
अतिवृष्टी व महापुराचा राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यंदाच्या वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे सुमारे ३० लाख हेक्टरवरील शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यासारखी पूरग्रस्तांची स्थिती नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या कुटुंबातील दहावी- बारावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह पालकांकडून होत आहे.
यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मार्च तर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी २०२६ मध्येच होणार आहे. परीक्षा पद्धतीत कोणताही बदल नसला तरी मागील परीक्षेवेळी ज्या केंद्रावर कॉपी केसेस आढळल्या, त्या केंद्रांची मान्यता जाईल. त्या केंद्रांची सध्या विभागीय स्तरावर सुनावणी सुरू असल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
परीक्षा केंद्रांची डिसेंबरमध्ये पाहणी
दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा गतवर्षी ज्या महिन्यात झाली, त्यानुसारच यंदाही होणार आहे. पण, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असल्याने प्रत्येक केंद्रांवरील सुविधा, नव्याने केंद्र होणाऱ्या शाळांची पाहणी डिसेंबरमध्ये केली जाणार आहे. शाळांना त्यांच्याकडील केंद्रांसाठी १० ऑक्टोबरपर्यंत बोर्डाला प्रस्ताव सादर करायचे आहेत. दरम्यान, यापुढे ज्या केंद्रांवर कॉपी केसेस आढळतील, त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याचे धोरण पुढे बोर्डाने निश्चित केले आहे.
पुरामुळे विद्यापीठाची परीक्षा लांबणीवर; आता २७ ऑक्टोबरपासून परीक्षा
सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी युवा महोत्सवामुळे आणि आता पूरस्थितीमुळे परीक्षा लांबली आहे. १४ ऑक्टोबरपासून सुरू होणारी परीक्षा आता २७ ऑक्टोबरपासून सुरू होईल. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी काढलेल्या आदेशानुसार, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याशिवाय परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकानुसार १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणारे पेपर परीक्षेच्या शेवटी घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ८८ नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश विद्यापीठातील संकुलांसह सर्व संलग्नित महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलावी आणि विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी करावी, अशी मागणी सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी कुलगुरूंकडे केली होती.
‘या’ विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क माफ
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क स्विकारताना ज्या विद्यार्थ्यांची ५० टक्के किंवा त्याहून कमी विषय राहिले आहेत, त्यांना या परीक्षेच्या एकूण शुल्कात ५० टक्के माफी असणार आहे. ५० टक्क्यापेक्षा जास्त विषयांसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. पण, एखाद्याचे सात विषय असतील तर त्यापैकी चार विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास ५० टक्के शुल्क माफी मिळेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.